महावितरणाने थकीत वीजबिलासंदर्भात कडक धोरण अवलंबले असल्याने शहरी भागापासून ते ग्रामीण भागापर्यंत कर्मचारी प्रत्यक्ष जाऊन वीज बिलसंदर्भात चौकशी करत आहेत. परंतु काही ठिकाणी कर्मचार्यांना मारहाणीचे प्रकार घडल्याचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास येत आहेत. तर काही ठिकाणी महावितरणाच्या अजब गजब कारभाराबद्दल ऐकून ग्रामस्थ हैराण झाले आहेत.
राजापूर मधील पाचल महावितरण विभागाच्या अनागोंदी कारभारा विरोधात तुळसवडे उपसरपंच संजय कपाळे यांनी कुटुंबासह २६ जानेवारी रोजी उपोषणास बसण्याचा ईशारा दिला आहे. विज बील भरण्यास विलंब झाला म्हणून कोणतीही पुर्वकल्पना न देता एकटी महिला घरात असताना, घरात घुसुन महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी विज कनेक्शन तोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप कपाळे यांनी केला आहे.
शनिवारी दुपारी ४ वाजण्याच्या दरम्यान, कोणतीही पुर्वकल्पना न देता महावितरणचे चार कर्मचारी आपल्या घरात घुसले व त्यांनी थेट वीज बंद केली. यावेळी आपली पत्नी घरामध्ये एकटी होती, तीने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता, तिच्याशी त्यांनी वाद घालयाला सुरुवात केल्याचे कपाळे यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे, वीज बंद करण्यासाठी तुमच्याकडे मिटर कट करण्याबाबतचे पत्र दाखवा अशी विचारणा केली असता असे कोणतेही पत्र नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यावेळी आम्ही वीज तोडण्यास विरोध केला व त्यांना घराबाहेर निघून जाण्यास सांगितले. याचा डूक मनात ठेवून त्यांनी संपुर्ण गावाला ज्या डीपीद्वारे विजपुरवठा केला जातो तो डीपीच बंद करून टाकला.
महावितरण कर्मचाऱ्यांना वीज तोडण्यास विरोध केला म्हणूनच त्यांनी संपुर्ण गावचा विजपुरवठा खंडीत केल्याचे कपाळे यांनी सांगितले. त्यामुळे महावितरणच्या या मुजोर कारभाराविरोधात आपण प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारीला कुटुंबासह आमरण उपोषणाला बसणार असल्याचे त्यांनी सांगितले.