कोकणच्या समुद्रात रविवारी रात्री एक संशयास्पद बोट आढळल्याने सर्व सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर असून सोमवारी दिवसभर पोलिसांसह नौदल आणि अन्य सुरक्षा यंत्रणांनी सागरी किनार पिंजून काढला. रायगड जिल्ह्यातील रेवदंडा किनारपट्टीवर नौदलाला एक बोट रडारवर दिसली. सोमवारी उशीरा ही बोट पाकिस्तानची असल्याचे नौदलाने स्पष्ट केले आहे. दरम्यान कोकणच्या समुद्रात संशयास्पद बोट आढळल्याने संपूर्ण कोकण किनारपट्टीवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार रविवारी रात्री उशीरा रायगडच्या अलिबाग रेवदंडाजवळ असलेल्या कोर्लई किल्ला येथे रडारवर नौदलाला एक बोट (बोटीचा काही भाग) दिसली. रायगडच्या समुद्रकिनाऱ्यावर अचानक अनोळखी बोट काही मच्छिमारांनाही दिसली होती. ही माहिती रात्रीपासून कोस्टगार्डलाही मिळाली होती. रात्री तिचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू झाला. मात्र ती अचानक गायब झाल्याने सर्वच यंत्रणांचे टेशन वाढले होते. सोमवारी सकाळपासून तिचा पुन्हा शोध घेण्याची मोहिम रायगड पोलिस तसेच नौदल आणि कोस्टगार्डच्या यंत्रणांनी सुरू केले. मात्र सोमवारी सकाळी ती रडारवर दिसत नव्हती.
हेलिकॉप्टरच्या मदतीने शोध – हा प्रकार समोर आल्यानंतर रायगड पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपासणी केली. त्यांनाही संबंधित संशयित बोट दिसलेली नाही. बोट खोल समुद्रात असल्याची माहिती मिळाली होती. सोमवारी सकाळपासून पुन्हा या बोटीला शोधण्याचं काम सुरू होतं. हेलिकॉप्टरच्या मदतीने देखील या बोटीचा शोध घेण्यात आला.
बोट पाकिस्तानचीच – दरम्यान सोमवारी दिवसभराच्या शोधकार्यानंतर तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मि ळालेल्या माहितीनुसार नौदलाच्या रडारवर दिसलेली ती बोटे पाकिस्तानमधील होती. मुकद्दर बोया ९९ असे या मासेमारीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाकिस्तानी बोटीचे नाव. आहे. ही बोट वादळामुळे पाकिस्तानच्या समुद्रकिनाऱ्याहून भारतीय हद्दीत आली असावी, असा नौदलाला संशय आहे. मात्र याबाबत खातरजमा झालेली नाही. संशयित बोट आढळताच संपूर्ण रायगड जिल्ह्यात सर्च ऑपरेशन करण्यात आले.
६०० पोलिसांनी जिल्हा पिंजला – हॉटेल, लॉज, रिसॉर्ट आणि इतर ठिकाणीही यंत्रणांनी झाडाझडती घेतली आहे. तर मासेमारीसाठी वापरण्यात येणाऱ्या जाळीचा बोया आणि त्याच्यासोबत ट्रांसपोंडर्स वाऱ्यामुळे वाहून आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. ही बोट भारतीय हद्दीत दिसताच यंत्रणा सतर्क झाल्या होत्या. ५२ अधिकारी आणि ६०० पोलिसांनी संपूर्ण रायगड जिल्हा पिंजून काढला.
चौकशीतून नेमकं काय समोर आलं? – या तपासानंतर रायगडच्या पोलिसांनीही मोठी आणि महत्वाची माहिती दिली आहे. रेवदंडा समुद्रकिनाऱ्यात जे आढळलं होतं तो बोटीचा केवळ एक छोटा भाग होता. सबंधित बोट ही पाकिस्तानच्या कराचीमध्येच आहे. मासेमारी बोटीचा बोया असल्याने त्याला जीपीएस ट्रॅकर आहे. या ट्रॅकरमुळेच भारतीय नौदलाने बोटीची ओळख पटवली आहे. मात्र मूळ बोट पाकिस्तानात असून बोटीचा काही अवशेष भारतात वाहून आल्याचं निष्पन्न झालं आहे. खबरदारी म्हणून पोलिसानी रायगड जिल्हा पिंजून काढला मात्र काळजी करण्यासारखे कारण नाही, रायगडच्या पोलिसांनी सांगितले आहे.