रत्नागिरी तालुक्यातील पाली-देवतळे येथे घराशेजारी रिकाम्या हौदात कांडेचोराची म्हणजे मांजरातील एक काळ्या रंगाचे मांजर, त्याची ३ पिल्ले असल्याची माहिती एका नागरिकाने वनविभागाला दिली. रत्नागिरी वन परिक्षेत्रातील परिमंडळातील देवतळे गावामध्ये जीवन जयवंत विंचू रा. पाली यांच्या घराशेजारील रिकाम्या पाण्याच्या हौदात शुक्रवारी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास कांडेचोरची साधारण सहा महिन्यांची तीन पिल्ले आढळून आली.
ही माहीती जागरूक नागरिकांनी वन विभागाला कळविली. त्यानंतर वरीष्ठ वन अधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार, परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार, न्हानू गावडे, प्र. स. साबणे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तिन्ही पिल्ले लहान असल्यामुळे त्यांच्या जीवाला धोका होता. त्यामुळे त्यांची विशेष काळजी घेणे आणि त्यांना सुरक्षित स्थानी हलवणे गरजेचे होते.
मागील काही वर्षांमध्ये औद्योगिकीकरण वाढल्याने सोबतच अनेक कारणांमुळे वन्य प्राण्यांचे जीवन धोक्यात सापडले आहे. त्यांना संरक्षण देण्यासाठी वन विभागाकडून आवाहन करण्यात आले होते. वन्यप्राणी मनुष्य वस्तीत आल्यास किंवा संकटात सापडल्यास टोल फ्री क्रमांकावर वन विभागाशी संपर्क साधावा. याला लोकांकडून स्वतःहून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
ग्रामीण भागामध्ये कायमच वन्य पशु लोकवस्तीत शिरत असल्याने अनेक वेळा परिस्थिती गंभीर उद्भवते. हिंस्र पशू मानव आणि पाळीव जनावरांवर हमला करत असल्याने एक प्रकारची दहशतच नागरिकांमध्ये बसली आहे.
देवतळे येथुनही अशाच प्रकारे संपर्क झाल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले. या संपर्कामुळेच कांडेचारोची तिन्ही पिल्ले सुरक्षित राहीली आहेत. दरम्यान, दोन दिवसांपुर्वी कारवांचीवाडी येथे अशाचप्रकारे एक घोरपड रस्त्याच्या डांबरामध्ये अडकून पडल्याची माहिती वन विभागापर्यंत पोचली. त्यांनी घटनास्थळी जाऊन त्या घोरपडीला संरक्षण दिले.