रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील पणदेरी धरणाला लागलेल्या गळतीची माहिती जिल्ह्यात सर्वत्र हांहां म्हणता पसरली. जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभाग मदतीसाठी घटना स्थळी दाखल झाला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. गर्ग आवश्यक साहित्यासह आपल्या १०० पोलीस अंमलदारांना सोबत घेऊन मदतीसाठी लागलीच घटनास्थळी रवाना झाले. स्थानिकांना धीर देऊन, न घाबरण्याचे आवाहन केले. महसूल व पोलीस प्रशासनाच्या मदतीने बौध्दवाडी, रोहिदासवाडी, कोंडगाव इत्यादी वाडीतील लोकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याकरिता मदत करण्यात आली.
पणदेरी धरणाला १९८० साली प्रशासकीय मान्यता मिळाली होती. जिथे ९० लाखांना ही मान्यता मिळाली होती, तिथे अधिकाऱ्याच्या सांगण्यानुसार, कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आल्याची गंभीर बाब समोर आल्याचे माजी आमदार संजय कदम यांनी सांगितले आहे. या धरणाचा मागील २५ वर्षामध्ये एकर भर जागेला पाणी देण्यासाठी उपयोग झाला नाही, तर तर एवढा अधिकाऱ्यांच्या सांगण्याप्रमाणे कोटीत खर्च करून त्याचा काय उपयोग ?
तिवरे धरणाच्या दुर्घटनेनंतर सर्व धरणांची शासनाने स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु यामध्ये मात्र या पणदेरी धरणाचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात आले नाही. मातीच्या या धरणाला गळती लागल्यानंतर शासनाची धावपळ सुरु झाली. शासनाचा स्ट्रक्चरल ऑडीटमध्ये केलेला हलगर्जीपणा आज अनेक स्थानिक ग्रामस्थांना भोवला असता.
पावसाची आता सुरुवात झाली असून अजून ९०% पाऊस पडणे शिल्लक आहे. त्यामुळे धरणाला नुसती वरवरची डागडुजी करून काहीही उपयोग होणार नाही, जर धरणाला कुठे तडा गेला तर, धरण संपूर्ण भरलेले असल्याने पाणी आवरणे हे अशक्यप्राय गोष्ट आहे. त्यामुळे तात्पुरते काम करून उपयोग होणार नसून, धरणातील पाणी कमी करण्याचे काम जितक्या लवकर करतील ते पुढील संभाव्य दुर्घटना टाळण्यास योग्य ठरेल.