नवीन मच्छीमारी कायद्याप्रमाणे आज १ जानेवारीपासून पर्ससीन मासेमारी बंदीचा काळ सुरु होत आहे. शासनाने निर्धारीत केलेल्या क्षेत्रात नवीन वर्षापासून पर्ससीन मासेमारी नौकेने प्रवेश करून मासेमारी केल्यास अशा नौकावर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. आणि नव्या कायद्यानुसार दंड दुप्पट आकारण्यात येणार असल्यामुळे मच्छिमारांच्या डोक्यावर कारवाईची टांगती तलवार राहणार आहे.
नवीन सुधारित कायद्यांबाबत मच्छीमार काही प्रमाणात नाखूष दिसत आहेत. आधी कायद्यांमध्ये बदल करण्यासाठी ते आग्रही दिसत होते तर आता त्यात सुधारणा घडवून आणून नवीन कायदा लागू केला असता, त्याबद्दळ सुद्धा काही मच्छीमारांमध्ये नाराजगी दिसून येत आहे. त्यामागील मुख्य कारण म्हणजे आकारण्यात येणारी दंडाची रक्कम.
मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त श्री.भादुले यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर बंदीच्या काळात मासेमारी करणाऱ्या पर्ससीन नौका आढळल्या तर त्यांना पहिल्या वेळेस सापडल्यास १ लाख रुपयांचा दंड आणि नौकेवर सापडलेल्या मासळीच्या पाचपट दंड आकारला जाणार आहे. तीच नौका दुसऱ्या वेळेला बंदीचे उल्लंघन करून मासेमारी करताना सापडल्यास तीन लाख रुपये दंड आणि नौकेवर सापडलेल्या मासळीच्या पाचपट दंड आकारला जाणार आहे. या कारवाईनंतर देखील तीच नौका तिसऱ्या वेळेस नियमांचे उल्लंघन करताना सापडली तर मात्र त्या नौकेला ५ लाख रुपये दंड आणि नौकेवर सापडलेल्या मासळीच्या पाचपट दंड आकारला जाणार आहे आणि ती नौका देखील जप्त करण्यात येणार आहे.
पर्ससीन नेट वापरून करण्यात येणाऱ्या मासेमारीमुळे पारंपारिक मच्छीमारी करणाऱ्या व्यावसायिकांची उपजीविका धोक्यात येत आहे. काही वेळा परप्रांतीय नौकांनी समुद्रावर केलेल्या चढाईमुळे स्थानिक मासेमार्यांची अवस्था बिकट बनत चालली आहे.