आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पावसाच्या झालेल्या दमदार सुरुवातीने अनेक ठिकाणी पूर आणि पडझड व्हायला सुरुवात झाली आहे. मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटामध्ये रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान दरड कोसळून माती रस्त्यावर आल्याने वाहतूकीची कोंडी झाली आहे.
परशुराम घाटात सध्या रस्ता चौपदरीकरणाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या दरडीनंतर डोंगरावरील माती रस्त्यावर आल्याने सर्व रस्ता चिखलमय झाला असून, महामार्गावरील वाहतूकीसाठी सुद्धा अडथळे निर्माण झाले. मागील दोन वर्षापासून रस्ता रुंदीकरण करताना सुद्धा दरड कोसळणे, पाऊस आणि वाऱ्यामुळे डोंगरावरील माती वाहून रस्त्यावर येणे असे प्रकार कायम घडतच असतात, त्यामुळे पावसाळ्यामध्ये बऱ्याच वेळा या ठिकाणची वाहतूक बंद पडते.
मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू असताना या घाटातील रस्ता रुंदीकरण कामाचा ठेका घेतलेल्या कंपनीने कामाचा त्रास इतर कोणाला होणार नाही त्याचा विचार करून वाहतूक सुरळीत कशी सुरू राहील, याची काळजी घेणे गरजेचे असते, परंतु, साधारण २ वर्षापासून कासवाच्या गतीने चाललेल्या या कामामुळे वाहनचालक संतप्त झाले आहेत. महामार्ग चौपदरीकरण कामाचा ठेका घेतलेल्या कंपनीने याकडे दुर्लक्ष केल्याने, वाहन चालकांना महामार्गावरून जाताना अक्षरश: सर्कस करत जावे लागत आहे.
परशुराम घाटात रविवारी सायंकाळी घटनास्थळी तातडीने पोहचून, दरड कोसळून रस्त्यावर आलेली माती दूर करून, वाहतूक सुरळीत करून देणे, संबंधित ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांचे कर्तव्य होते, परंतु, कंपनीने त्याकडे संपूर्ण कानाडोळा केला. काही लहान वाहने सुद्धा त्यामध्ये अडकून पडली होतीत. महामार्ग चौपदरीकरण कंपनीच्या गतीने कधीही पूर्ण होऊ द्या, पण निदान तोपर्यंत वाहतुकीसाठी रस्ता सुस्थितीत ठेवा, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. दरड कोसळलेल्या ठिकाणाहून वाहन अत्यंत धीम्या गतीने पुढे सरकत असल्याने, महामार्गावर लांबच्या लंब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अखेर कल्याण टोलवेज ठेकेदार कंपनीची यंत्रणा तेथे दाखल झाल्यावर, रस्त्यावरील माती दूर करण्यात आली.