मुंबई-गोवा महामार्गावर चौपदरीकरणाचे काम ठिकठिकाणी सुरू आहे. मात्र, त्याच्या मोबदल्यावरून परशुराम देवस्थान, खोत आणि कुळ यांच्यामध्ये निर्माण झालेले वाद काही अद्यापही सुटलेले नाहीत. या स्थानिक वादामुळे परशुराम घाटातील काम स्थगित करण्यात आले आहे. प्रशासनाने सूचना देऊनही ठेकेदार कंपनी या भागामध्ये स्थानिकांच्या वादामुळे काम करण्यास धजत नाही आहे.
प्रशासनाकडून जमीन मालक, खोत आणि कुळांनी आपापसात वाद मिटवून त्यावर तोडगा काढावा. पावसाळ्यानंतर काम सुरू करू, असे आश्वासन देण्यात आले होते. तसेच कूळ ८० टक्के, खोत १० टक्के व देवस्थान १० टक्के अशा पद्धतीने मोबदल्याचा प्रस्ताव करण्यात आला होता. जिल्हाधिकारी यांच्याकडून कूळ व देवस्थानसाठी ९०-१० चा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र, या दोन्ही प्रस्तावांवर अंतिम निर्णय झालेला नसल्याने , पेढे व परशुरामच्या ग्रामस्थांनी पुन्हा चौपदरीकरणास तीव्र विरोध केला आहे.
चौपदरीकरणाचे काम रखडले असले तरी परशुराम घाट रस्ता आता ढासळत चालला आहे.पावसाळ्यात या ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्याने मोठा धोका निर्माण झाला होता. त्यातच आता काही ठिकाणी रस्ता खचू लागल्याने हा मार्ग धोकादायक बनला आहे़ त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे़ या भागात सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी केली जात आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटातील जमीनदारांच्या मोबदल्याचा गुंता अजूनही न सुटल्याने चौपदरीकरणाचे रखडलेले आहे. या मार्गावरून सतत वाहनांची वर्दळ सुरू असते. त्यामुळे या भागाकडे वेळीच लक्ष न दिल्यास हा भाग कोसळून दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे. सध्या अवकाळी पावसाने थैमान घातले असून, पावसामुळे हा भाग आणखीन ठिसूळ होऊन ढासळण्याचा धोका वाढतच चालला आहे.