पश्चिम रेल्वेमार्गावरून कोकणात जाण्यासाठी एक गाडी सोडण्यात यावी, या कोकणवासीयांच्या मागणीची दखल घेऊन या मार्गावर एक गाडी सुरू करण्यात आली. बांद्रा-मडगाव-बांद्रा द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस ही पश्चिम रेल्वेमार्गावरून कोकणासाठी धावणारी ही एकमेव गाडी असल्याने तिला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद लाभणे अपेक्षित होते. २९ ऑगस्टपासून सुरू झालेल्या या ट्रेनमधून सुरुवातीला क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत होते; परंतु आता मात्र प्रवासी संख्या घटली आहे. कोकण मार्गावरील अनेक स्थानके वगळण्यात आल्याने हा फटका बसला आहे. गणेशोत्सवात या ट्रेनमधून तिच्या क्षमतेपेक्षा १० ते १५ टक्के अधिक प्रवासी प्रवास करत होते; मात्र आता प्रवासी संख्या कमी झाली आहे. आता प्रवासी संख्या ७० ते ७८ टक्के एवढ्यावर आल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. मुंबईहून निघताना ही गाडी बांद्रा या स्थानकावरून सकाळी ६.५० वा. निघते ती तब्बल १२ तास १० मिनटे इतका अवधी घेऊन संध्याकाळी ७ वा. सावंतवाडी टर्मिनस येथे पोहोचते तर जवळपास एवढ्याच अंतराच्या प्रवासासाठी सकाळी ७.१० वा. मुंबई सीएसएमटीवरून सुटणाऱ्या मांडवी एक्स्प्रेसचा सावंतवाडी टर्मिनस येथील वेळ संध्याकाळी ४ वाजून २८ मिनिटे असा आहे.
म्हणजे या प्रवासाला मांडवी एक्स्प्रेस ९ तास १८ मिनिटे इतका अवधी घेते. या गाडीला काही मोजकेच थांबे देण्यात आले आहेत. वसईमधून या गाडीला मध्य रेल्वेच्या ट्रॅकवर वळवावे लागत असल्याने अधिकची लागणारी ३० ते ४५ मिनिटे सोडली तरी ही गाडी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत तरी सावंतवाडी स्थानकावर पोहोचणे अपेक्षित आहे. तळकोकणात ही गाडी उशिरा पोचत असल्याने पुढील प्रवासासाठी मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याने येथील प्रवासी या गाडीला पसंती देताना दिसत नाहीत.
‘कोरे’ मार्गावरील अनेक स्थानके वगळली – ज्या थाटात ही गाडी सुरू करण्यात आली होती, त्यामुळे सुरुवातीला प्रवाशांनी या गाडीला पसंती दिली; मात्र त्यानंतर या गाडीला प्रवाशी संख्या घटली आहे. कोरे मार्गावरील खेड या स्थानकावर अन्य दोन तालुक्यांचा भार असताना देखील खेड थांबा वगळून प्रवाशांवर अन्याय केला आहे. त्यामुळे या गाडीला हा थांबा मिळावा, ही मागणी असूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.