नवीन आलेल्या एसटी बसची उंची पूर्वीच्या बसपेक्षा जास्त आहे. जुन्या लालपरीच्या बसेसची संख्या खूप कमी आहे. नवीन बसेस ग्रामीण भागात जाताना तिथे रस्त्यात येणाऱ्या झाडांच्या फांद्या गाडीच्या वरील भागाला लागतात आणि पत्रा निघतो. त्या भागातून बसला गळती लागत असल्याचे कारण पुढे आले आहे. संगमेश्वर तालुक्यातील विविध मार्गावर धावणाऱ्या बसना पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गळती लागत आहे. त्यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. जुन्या गाड्यांबरोबरच नवीन गाड्यांमध्येही तीच परीस्थिती आहे.
याबाबत संगमेश्वरमधील नागरिकांनी एसटी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून गळक्या गाड्यांचे कारण जाणून घेतले. आत्ताच्या काळात नवीन आलेल्या बसची उंची पूर्वीच्या बसपेक्षा अधिक आहे. त्यातच जुन्या लालपरीच्या गाड्यांची संख्या खूप कमी आहे. नवीन बसेस ग्रामीण भागात जाताना रस्त्यात येणाऱ्या झाडांच्या फांद्यावरील भागाला लागतात. त्यामध्ये गाड्यांच्या वरच्या बाजूचा पत्रा निघतो आणि बसला गळती लागते. यावर उपाय म्हणून या गावातील ग्रामपंचायतीना एसटीतर्फे एक पत्र देऊन अशा फांद्या तोडण्याबद्दल विनंती केली असल्याचे एसटी प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
त्या त्या गावातील सरपंच किंवा लोकप्रतिनिधींनी सहकार्य केल्यास ही समस्या दूर होईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ज्या बसेसच्या छतावरील पत्रा निघाला असेल त्याची दुरुस्ती करण्यात येणार आहे; परंतु ग्रामीण भागात असणाऱ्या झाडाच्या फांद्या छाटल्याशिवाय दुरुस्ती करून काहीच उपयोग होणार नाही. या परिस्थितीमुळे जुन्या गाड्याच ग्रामीण भागात पाठवाव्या लागतात. नवीन गाड्या तिकडे पाठवू शकत नाही, असे आगार व्यवस्थापक फडतरे यांनी सांगितले.