सिंधुदुर्गातील पेंडूर परिसरामध्ये गेले अनेक दिवस गव्यांनी थैमान घातले आहे. झुंडीने येऊन शेतीचे देखील मोठ्या प्रमाणात नासधूस करत आहे. हाताशी आलेली पिके अशी डोळ्यासमोर नासधूस होताना बघून, शेतकरी देखील हवालदिल झाले आहेत. गव्याच्या मानवी वस्तीतील वावरामुळे स्थानिकांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणात भीती निर्माण झाली आहे.
शेतात काम करत असताना, गव्याने अचानक केलेल्या हल्ल्यामध्ये पेंडूर-सातवायंगणी येथील शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. शेतकऱ्यावर अशा प्रकारे हल्ला चढवल्याने परिसरामध्ये गव्याची दहशत निर्माण झाली आहे. शशिकांत बाबूराव नाईक वय ५५ असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना सकाळी आठच्या सुमारास घडली असून, त्यांना जखमी अवस्थेत तेथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
घडलेल्या घटनेची मिळालेली अधिक माहिती अशी कि, शशिकांत नाईक सकाळी घराशेजारील नारळ बागेत कामासाठी गेले होते. बागेत अचानक त्यांच्या मागून आलेल्या गव्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेची माहिती वन अधिकाऱ्यांना येथील सामाजिक कार्यकर्ते देवा कांबळी यांनी फोन करून दिल्यानंतर, वन अधिकारी श्री. इब्रामपूरकर व श्री. नराळे घटनास्थळी दाखल झाले आणि घटनेची संपूर्ण माहिती घेतली. नाईक यांचा जबाब नोंदवून त्यांना उपचारासाठी तत्काळ १० हजार रुपयांची मदत करण्यात आली.
गव्याच्या अशा प्रकारच्या त्रासामुळे आणि हल्ल्यामुळे या गव्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी वन विभागाकडे ग्रामस्थांकडून होत आहे. वन अधिकारी देखील या गव्यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती पदाधिकाऱ्यानी दिली आहे.