अब्जावधीची विकासकामे करून देखील शिवसेना सदस्य नोंदणीत बालेकिल्ल्यात आपण चौथ्या क्रमांकासाठी झगडत असू, तर ही दुर्दैवी गोष्ट आहे. याचे आत्मपरीक्षण करण्याची सर्वांना गरज आहे. येत्या पंधरा दिवसांमध्ये सर्वांनी रस्त्याची कामे बाजूला ठेवा आणि संघटनात्मक सदस्य नोंदणीचे काम करा. राज्यात जिल्हा पहिल्या तीनमध्ये येईल, असे काम दाखवा, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. येथील जयेश मंगल कार्यालयात आयोजित शिवसेना जिल्हा कार्यकारिणीच्या सदस्य नोंदणी मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी जिल्हाप्रमुख राहुल पंडित, माजी आमदार राजन साळवी, सदानंद चव्हाण, राजेंद्र महाडीक, विलास चाळके, शिल्पा सुर्वे आदी उपस्थित होते. या वेळी जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उदय सामंत म्हणाले, जिल्ह्यामध्ये राजापूर तालुक्यात ४ हजार १८९ एवढी नोंदणी होऊन आज हा तालुका पहिल्या क्रमांकावर आहे.
त्या खालोखाल ३ हजार ९७९ सदस्य नोंदणी करून दापोली, खेड, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे; परंतु रत्नागिरी, चिपळूण, गुहागर हे तालुके चौथ्या क्रमांकासाठी झटत आहेत, ही दुर्दैवी बाब आहे. त्यामुळे मी याचे आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे; परंतु येत्या पंधरा दिवसांमध्ये रत्नागिरी तालुका पहिल्या क्रमांकावर येईल, असे नियोजन केले आहे. निधीसाठी पालकमंत्र्यांना वेठीस धरून रस्ते करून घेतले. मग त्या रस्त्याने जाणाऱ्यांना सदस्य करून घेण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. सदस्य नोंदणीसाठी घरोघरी फिरा. शासनाने केलेली कामे सांगा. पक्षाचे काम सांगा. रस्त्यावरच्या चर्चा बंद करा. कोण जुना, कोण नवा. कोण आता आला कोण आधीपासून होता, हे सर्व आता गौण आहे. आपण संघटना म्हणून एकदिलाने काम करायचे आहे.
स्वबळाचीही तयारी ठेवा – सर्वांनी एकदिलाने काम करून शिवसेना संघटना मजबूत करूया. समोरचा अंगावर आला तर त्याला शिंगावार घ्या. जशास तसे उत्तर देण्याची तयारी ठेवा. विचाराने त्यांचा बंदोबस्त करा. भविष्यात महायुती म्हणून निवडणुका लढायच्या आहेत; परंतु शिवसेना पक्ष बळकटीकरणासाठी स्वबळाचीही तयारी ठेवा, अशा सूचना उदय सामंत यांनी दिल्या.