कोकणातील जनतेला दरवर्षी कोणत्या ना कोणत्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या भागात आपत्ती निवारणासाठी कायमस्वरुपी योजना राबविण्यावर भर देणार असल्याचे आपत्ती व्यवस्थापन व मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे.
विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासांत ते महाड आणि कोकणातील आपत्तीसंदर्भात बोलत होते. कोकणात नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसान झालेल्यांना भरपाई देण्याचे काम सुरु आहे. त्याचप्रमाणे पिण्याचे पाणी, शाळा, समाजमंदिर, स्मशानभूमी यासारख्या सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसान दुरुस्तीसाठी ३५ कोटी रुपये इतका निधी देण्यात येत आहेत, अशी माहिती श्री. वडेट्टीवार यांनी दिली.
त्याचप्रमाणे, एका महिन्यात हा निधी संबंधित विभागाकडे सुपूर्द केला जाईल, असे त्यांनी सांगितले. दरवर्षी त्याच समस्यांना तोंड द्यायला लागू नये म्हणून कायमस्वरुपी उपाययोजना म्हणून कोकणी माणसाला आपत्ती आणि संकटातून मुक्त करण्यासाठी सर्व नदी, नाले यांचा गाळ उपसा करून, खोलीकरण करण्यात येईल. यासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. हे कार्य जलसंपदा विभागामार्फत तसेच खार जमीन विकासाच्या माध्यमातून राबविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
रस्त्यांचे नुकसान, विद्युत जोडणी, गावागावात वीज पुरवठा, शाळेचे नुकसान, आरोग्य केंद्र यासारख्या सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानी संदर्भात देखील मदत करण्याची त्यांनी ग्वाही दिली आहे. या विषयाच्या अनुषंगाने उपस्थित झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री अनिकेत तटकरे, ॲड. निरंजन डावखरे, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, बाळाराम पाटील, भाई गिरकर, कपिल पाटील आदींचा सहभाग होता.