रसिक प्रेक्षक ५०० रुपये देऊन नाटक पाहायला येतात. त्यांना एसी आणि साऊंड सिस्टिम सारख्या सुविधा मिळणे अपेक्षित असते. त्या मिळाल्या नाहीत तर प्रेक्षक नाटकाकडे वळणार नाहीत आणि अशा परिस्थितीत प्रयोग करणे कलाकारालाही शक्य होणार नाही. या सगळ्या दुरवस्थेबद्दल मी प्रेक्षकांना आवाज उठवण्याचे आवाहन केले. या गैरसोयी दूर होइपर्यंत आपण यापुढे प्रयोग करणार नाही, असे प्रेक्षकांना सांगितले. यात मस्ती असण्याचा किंवा अस्मिता दुखावण्याचा हेतू नव्हताच. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असे स्पष्ट मत सुप्रसिद्ध अभिनेता भरत जाधव याने व्यक्त केले. अभिनेता भरत जाधव यानी नाट्यगृहाच्या दुरवस्थेबद्दल नाराजी व्यक्त केल्यानंतर रत्नागिरीत याच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. कुणी रत्नागिरीच्या अस्मिता दुखावल्याच्या भावना व्यक्त केल्या तर कुणी भरत जाधव यांनी एवढा कांगावा करण्याची गरज नसल्याचे मत व्यक्त केले. काहीनी फेसबुकवर पोस्ट लिहून प्रतिक्रिया व्यक्त केल्या. याच पार्श्वभूमीवर अभिनेता भरत जाधव यांच्याशी संपर्क साधून त्यांची सविस्तर प्रतिक्रिया जाणून घेतली.
भरत जाधव म्हणाले, रंगभूमी हा माझा किंबहुना इथे काम करणाऱ्या प्रत्येकाचा श्वास आहे. मी स्वतः शुन्यातून वर आलेला कलाकार आहे. मी जो आहे तो रसिकांनी दिलेल्या प्रेमामुळे आहे याची मला जाणीव आहे. आम्ही कलाकार कला सादर करत असताना जीव ओतून काम करतो. जेणेकरून उपस्थित रसिक प्रेक्षक त्याचा आनंद लुटू शकतील. परंतु ज्या नाट्यगृहाची रचनाच बंदिस्त आहे; त्यात वातानुकूलित यंत्रणा काम करत नसतील तर घामाघूम होऊन प्रेक्षकाना आनंद देऊ शकत नाही. नाट्यगृहाचे भाडे आणि त्याचे तिकिट दर जर एसीच्या सेवेसह घेतले जात असतील तर त्या सेवा योग्य पद्धतीने काम करायला हव्यात एवढी किमान अपेक्षा मी व्यक्त केली तर माझे काय चुकले ?