एकट्या राहणाऱ्या महिला हेरून त्यांच्या हत्या, लुबाडणूक, फसवणुकीचे प्रकार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घडताना दिसून येत आहेत. एका पाठोपाठ एक अशा घटना घडू लागल्याने जिल्हा हादरला आहे. चिपळूण तालुक्यातील येथील पेठमाप भागात राहणाऱ्या एका महिलेचा घरात कोणी नसताना, अज्ञातांनी तिच्या अंगावर अॅसिड टाकून चेहऱ्यावर वार करत खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मृत महिला आपल्या मुलासोबत घरामध्ये राहते. कदाचित अशा परिस्थितीचे ज्ञान असल्यामुळेच कोणी अज्ञातांनी तिचा खून केला आहे. मृत महिला ही आपल्या मुलासोबत पेठमाप येथे वास्तव्यास होती. सोमवारी तिचा मुलगा क्रिकेट स्पर्धेसाठी रत्नागिरी येथे गेला असताना ही धक्कादायक घटना घडली. कुलसूम अन्सारी अस मृत महिलेचे नाव असून चिपळूण पोलिसांनी श्वान पथकाच्या साहाय्याने खून प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी तापसकाम सुरू केले आहे.
मृत महिलेचा मुलगा हा रत्नागिरीमध्ये क्रिकेट सामन्यासाठी आला होता. त्यामुळे त्याची आई घरामध्ये एकटीच होती. तिचा मुलगा सतत तिला मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता, पण समोरून त्याची आई फोन उचलत नव्हती. त्यामुळे मुलाने आपल्या मित्रांना घरी जाण्यासाठी सांगितले. आणि आईशी बोलायला दे असे सांगितले.
परंतु, ज्यावेळी मित्र घरी पोहोचले त्यावेळी घरातील परिस्थिती पाहून ते घाबरून गेले. सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यावेळी घाबरलेल्या मित्रांनी शेजाऱ्यांना बोलावून घेतले. यावेळी घरात कुलसूम अन्सारी यांचा मृतदेह एका बाजूला झाकून ठेवल्याचे निदर्शनास आल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. कोणत्या कारणावरून हा खून कोणी केला याबद्दल पोलीस पुढील तपास करत आहेत.