गेल्या तीन वर्षांपासून प्रशासकीय राजवट असलेल्या राजापूर पालिकेमध्ये आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या असून, प्रशासनाकडून प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. नव्या प्रारूप प्रभाग रचनेमध्ये पूर्वीच्या आठ प्रभागांचे दहा प्रभागांमध्ये विभाजन होणार आहे. त्यामुळे नगरसेवकांची संख्या आठवरून दहा होणार आहे. त्यामुळे राजकीय गणिते बदलणार असून, नव्याने निवडणूक मोर्चेबांधणी करण्याचे आव्हान विविध पक्षांसमोर आहे. शहराच्या राजकीय वर्तुळामध्ये काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट), शिवसेना (शिंदे गट), भाजप, राष्ट्रवादी या प्रमुख राजकीय पक्षांची ताकद आहे. सद्यःस्थितीमध्ये काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी यांच्याकडून आघाडी म्हणून मोर्चेबांधणी केली जात असल्याचे चित्र आहे. केंद्र अन् राज्यातील सत्ताधारी असलेल्या युतीतील भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) या मित्रपक्षांकडून स्वबळाची चाचपणी केली जात आहे. मात्र, नवीन प्रभागरचना आणि बदललेली राजकीय समीकरणे यामध्ये पालिका निवडणुकीत बहुमतासह वर्चस्व राखणे राजकीय पक्षांसमोर आव्हानात्मक राहणार आहे.
रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या हालचाली सुरू आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची गट-गण रचना नुकतीच जाहीर झाली. त्या पाठोपाठ आता नगरपालिकेच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. २०१६ मध्ये झालेल्या पालिकेच्या निवडणुकीमध्ये आठ प्रभागातील सतरा जागांसाठी लढती झाल्या होत्या. आता नव्या प्रारूप प्रभाग रचनेमध्ये पूर्वीच्या प्रभागसंख्येमध्ये दोनने वाढ होताना आठऐवजी दहा प्रभागसंख्या होणार आहे. त्याचवेळी नगरसेवकांची संख्येमध्येही तीनने वाढून वीस होणार आहे. जुन्या प्रभागांचे विभाजन होऊन नवी प्रारूप प्रभाग रचना तयार केली जाणार असल्याने नव्या प्रभाग रचनेमध्ये जुन्या प्रभागातील मतदारांची अदलाबदल होऊन त्यातून, नवीन राजकीय समीकरणे उदयास येणार आहेत.
२०१६ मधील राजकीय स्थिती – राजकीय स्थितीचा विचार करता २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये सतरा नगरसेवक असलेल्या राजापूर पालिकेमध्ये काँग्रेसचे सात, शिवसेना आठ आणि राष्ट्रवादी-भाजपचा प्रत्येकी एक नगरसेवक निवडून आला होता. त्यानंतर, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला भाजपच्या नगरसेवकाची साथ मिळाल्याने पालिकेमध्ये आघाडीचे वर्चस्व होते. त्यानंतर, पाच वर्षामध्ये फारशा राजकीय घडामोडी घडल्या नाहीत; मात्र, राज्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये घडलेल्या पक्षांतर्गत घडामोडीचे पडसाद गेल्या दोन वर्षामध्ये राजापुरात उमटून समीकरणेही बदलली आहेत.