येत्या गणेशोत्सवासाठी अनेक चाकरमानी मुंबई, पुण्याहून कोकणात दाखल होतात. उत्सवाच्या आधी साधारण ४-५ दिवस आधीच स्वतःचे वाहन अथवा रेल्वे किंवा खाजगी वाहतुकीने कोकणात गावी दाखल होतात. पण मागील वर्षीपासून उद्भवलेल्या कोरोनाच्या महामारीमुळे यावर्षी लस उपलब्ध झाल्याने परिस्थिती आटोक्यात आहे. परंतु तरी सुद्धा शासनाने चाकरमान्यांसाठी केलेल्या नियमावलीमुळे विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सरकार विरोधी वक्तव्य केले आहे.
त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे कि, ज्यांनी तुम्हाला भरभरून दिलं त्यांचा छळ करण्याचं सरकारने ठरवलं आहे का ? राज्य सरकारने कोकणवासीयांचं छळ करण्याचं ठरवलं असून गणेशोत्सव काळात त्यांच्यावर निर्बंध लादून त्यांना विनाकारण त्रास दिला जात आहे, असा आरोप विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे.
बुधवारी प्रसार माध्यमांशी बोलताना दरेकर म्हणाले की, शिवसेनेला कोकणवासीयांनी भरभरून प्रेम दिले आहे त्यामूळे कोकणवासीयांची चिंता-काळजी करण्याची विशेष जबाबदारी आणि कर्तव्य शिवसेनचंच आहे. परंतु सत्तेच्या लालसेपोटी कोकणवासीयांना फक्त वाऱ्यावर सोडण्याचं काम शिवसेनेने केलं आहे. गणेश उत्सवाला गावी जाताना, एक तर इतका वेळ प्रवास करून गावात पोहोचायचं आणि त्यानंतर कोरोना चाचणीसाठी ताटकळत रहायच, हा त्रास चाकरमान्यांना होणार नाही, याची खबरदारी आणि पूर्ण व्यवस्था सरकारने करायची आहे अशी मागणी दरेकर यांनी केली आहे.
कोकणाने गेल्या दोन वर्षांपासून अनेक नैसर्गिक आपत्तींचा सामना केला असून, कोरोना संकटकाळ असो, निसर्ग चक्रीवादळ असो किंवा तौक्ते वादळ असो यामध्ये आर्थिक अवस्था डबघाईला गेली आहे. अनेक संकटातून बाहेर येत असताना आता सण साजरे करताना येणारे निर्बंध त्यामुळे आतातरी गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल होणाऱ्या चाकरमान्यांना त्रास होणार नाही, याची राज्य सरकारने दक्षता घ्यावी, अशी मागणी दरेकर यांनी केली आहे.