महामार्गावरील रोजचे वाढते अपघात हि एक मोठी समस्या बनत चालली आहे. तसे जगभरात वाहनांच्या अपघाताचे प्रमाण वाढणारे आणि चिंताजनक बनत चालले आहे. सीट बेल्ट न लावणे, हेल्मेट न वापरणे , मद्य प्राशन करून वाहने चालवणे, झोपेच्या अधिन होऊन जास्त वेळ ड्रायव्हिंग करणे, तुफान वेगाने गाड्या पळवणे ही अपघाताची प्रमुख कारणे आहेत. प्रामुख्याने खराब रस्ते, नियमांचे पालन न करणे, निष्काळजीने वाहने चालवणे यामुळे आपल्याकडे अपघात होतात.
पहाटे रायगड खोपोलीजवळ पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर एका कंटेनर ट्रकने सहा वाहनांना धडक दिल्याने त्यामध्ये चार जण ठार, तर दोन जण जखमी झाले आहेत. ही घटना पुणे ते मुंबई एक्सप्रेस वे वर, पुणे शहरापासून सुमारे ७० किमी अंतरावर, सकाळी ६.३० वाजताच्या दरम्याने घडली, याबाबतची माहिती एक्स्प्रेस वे कंट्रोल रूमच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
खोपोली पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिरीष पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, खोपोली एक्झिटजवळ वाहतूक कोंडी झाली होती आणि अनेक वाहने थांबली होती. पुण्याच्या दिशेने निघालेल्या कंटेनरचे नियंत्रण सुटल्याने त्याने तीन कार, एक टेम्पो आणि अन्य कंटेनरसह सहा वाहनांना त्याने धडक दिली. यामध्ये स्विफ्ट कारमधून प्रवास करणारे चार प्रवासी जागीच गतप्राण झाले, तर दुसऱ्या कारमधून प्रवास करणारे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातानंतर रायगड जिल्ह्यातील बचाव पथके आणि एक्सप्रेस वे आपत्कालीन प्रतिसाद पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना नवी मुंबईतील रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवले. या अपघातामुळे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी झाली आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि खराब झालेली वाहने रस्त्यावर उतरवण्यासाठी अधिकाऱ्यांना सुमारे एक तासाचा अवधी लागला.