रत्नागिरी जिल्हा आणि सातारा या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या रघुवीर घाटामध्ये पुन्हा मोठी दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे. रघुवीर घाटात दरड कोसळण्याची आजची गेल्या १५ दिवसांमधील ही तिसरी घटना असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या खेड तालुक्यातील रघुवीर घाटात मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा मोठी दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. या घटनेमुळे सातारा जिल्ह्यातील २० गावांचा रत्नागिरी जिल्ह्याशी संपर्क तुटला आहे. सातारा जिल्ह्यातील २० गावांना संपर्कासाठी असणारा हा एकमेव रघुवीर घाट आहे. हवामान विभागाने कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये ४८ तास रेड अलर्ट घोषित केला असून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे हवामान विभागाकडून नागरिकांना सावध राहण्याची सूचना देण्यात आली आहे.
काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच नदीकाठच्या गावांना सुद्धा सावध राहण्याची सूचना देण्यात आली आहे. या घाटाचे काम करून त्यास सुस्थितीत आणल्यास व कोयना बॅकवॉटर परिसरात पूल बांधल्यास रत्नागिरी ते सातारा हे अंतर अतिशय जवळ येईल. असे झाल्यास पश्चिम महाराष्ट्र व कोकणासाठी एक नवा पर्यायी सक्षम मार्ग अस्तित्वात येईल.
योगायोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुळचे सातारा जिल्हयातील असल्याने व आमदार योगेश कदम हे त्यांच्यासमवेत असल्याने या कामाला गती मिळेल असा विश्वास खेडवासियांनी व्यक्त केला आहे. प्रत्येक मुसळधार पावसामध्ये घाट रस्त्यांमध्ये दरड कोसळण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडताना दिसून येत आहेत. त्यामुळे वाहनचालकांनमध्ये पण घबराट पसरली आहे.