माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र तेजस ठाकरे यांची राजकारणात एंट्री होणर असल्याचे वृत्त समजल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सर्व कुटुंब राजकारणात सक्रीय असून देखील राजकारणामध्ये कधीही दृष्टीस न पडलेल्या तेजस ठाकरेंच्या राजकारणातील प्रवेशावरून निलेश राणे यांनी खोचक टीका केली आहे.
तेजस ठाकरे पाली, सरडे शोधता शोधता राजकारणात आले, त्यांना केवळ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मुलगा म्हणून फुकटात मंत्रीपद मिळेल, पण त्यांचे तेवढे कर्तृत्व नाही, अशा शब्दात भाजप नेते निलेश राणे यांनी जळजळीत टीका केली आहे. गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांचे धाकटा मुलगा तेजस ठाकरे राजकारणात प्रवेश करण्याची राजकीय गोटात जोरदार चर्चा सुरु आहे. यात तेजस ठाकरेंच्या वाढदिनीच त्यांच्या राजकारणातील प्रवेशाची घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे. मात्र तेजस ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्य़ेलाच निलेश राणे यांनी अशा प्रकारची खोचक टीका केली आहे.
तेजस ठाकरे पाली, सरडे शोधता शोधता राजकारणात आले. ठाकरेंनी सर्व महत्त्वाची पदं कुटुंबातच ठेवली आहे, त्यांनी बाहेरचं कोण चालत नाही, बाकीच्यांनी फक्त खुर्च्या आणि टेबल उचलण्याचे काम करायचे. व्यक्ती कितीही शेंबडा असू दे आडनाव ठाकरे असेल तर तो मुख्य पदावर दिसेल, असा टोला निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना देखील लगावला आहे.
सगळी पद ठाकरे स्वत:कडे ठेवणार, तेव्हा कार्यकर्त्यांनी विचार करा त्यांना किती साथ द्यायची. उद्धव ठाकरेंपासून ते तेजस ठाकरेंपर्यंत जे काही मिळाले ते केवळ ठाकरे आडनावामुळे, बाकी कर्तृत्व शून्य अशी थेट टीकाही निलेश राणेंनी केली.