सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन पासून कुडाळच्या दिशेने असलेल्या पुलाच्या ठिकाणी रेल्वेच्या मालवाहू गाडीची धडक बसून अनोळखी महिला जागीच ठार झाली. सोमवारी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास घडलीया मृत महिलेची ओळख पटविण्याचे काम उशिरा पर्यंत सुरु होते. घटनास्थळाच्या परिस्थितीवरून या महिलेने आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवला असून याबाबत येथील पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सावंतवाडी तळवडे मार्गावरील रेल्वे पुलाच्या खाली स्टेशनपासून काही अंतरावर असलेल्या रेल्वे ट्रॅकलगत एक महिला उभी असलेली अनेकांनी पहिले. दुपारी सव्वा तीनच्या सुमारास ही महिला रेल्वे रुळावरून येत असलेल्या मालवाहू गाडीसमोर अचानक आल्यामुळे तिला रेल्वेची धडक बसली. यात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ती जागीच ठार झाली. याबाबतची माहिती मालवाहू गाडीच्या चालकाने सावंतवाडी रोड स्थानकात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही महिला सुमारे ६० ते ६५ वर्षे वयोगटातील असून तिच्याजवळ एक पर्स सापडली असून त्या पर्समध्ये पंधराशे रुपये रक्कम व एका चष्म्याची पावती सापडली आहे त्यामध्ये ती मालाड मुंबई असे लिहिल्याचे आढळून आले. मात्र त्या पलीकडे मोबाईल, फोटो अथवा कोणताही ओळख पटविण्याजोगा पुरावाच नसल्याने ओळख पटविण्यात विलंब होत असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे मिळालेल्या पावती वरील नंबरवर संपर्क करून ओळख पटविण्याचे काम सुरु होते.
या घटनेची माहिती पोलिस ठाण्यात मळगाव स्टेशन मास्तर यांनी दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मालवाहू गाडीला ही महिला धडकून अपघात झाला व हा अपघात नसून ती महिला रेल्वेसमोर आली त्यामुळे ही घटना आत्महत्या असल्याचे मालवाहू गाडीच्या चालकाने सांगितले, अशी माहिती स्टेशन मास्तर यांनी पोलिसांना दिली.