कोकणामध्ये अळंबी हा पदार्थ मोठ्या चवीने खाल्ला जातो. जशी चिकनची चव असते तशीच अळंबीची सुद्धा चव असते. सध्या पावसाळा सुरू असल्याने जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात अळंबी उगवू लागते. ग्रामीण भागातील लोक उदरनिर्वाहासाठी त्याची विक्री करतात. अळंबीच्या एका वाट्याची किंमत ५०० ते ७०० च्या दरम्यान असते. आणि ठराविक मोसमामध्ये नैसर्गिकरित्या उपलब्ध होणाऱ्या या अळंबीला मागणी मोठ्या प्रमाणात असते. इंग्रजी भाषेमध्ये तिला मशरुम असे म्हटले जाते.
सध्या नैसर्गिक प्राप्त होणाऱ्या अळंबीचे व्यवसायिकरण झाल्याने वर्षाचे १२ महिने सुद्धा अळंबी उपलब्ध असते. अळंबीचे उत्पादन घेणे हे अनेक जणांसाठी उत्पन्नाचे साधन बनले आहे. पण त्यामध्येही विषारी आणि बिनविषारी असे २ प्रकार असतात. देशात, परदेशामध्येही अळंबीला मागणी भरपूर आहे. परंतु, काही वेळा विषारी अळंबीचे सेवन केल्याने मृत्यू देखील ओढवण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे विषारी आणि बिनविषारी अळंबी ओळखणे हे कौशल्य असून, त्यासाठी अनुभव नक्कीच कामी येतो. कारण, अळंबी ही सर्व प्रकारची एक सारखीच दिसते, अनुभवीनांच त्यातील फरक ओळखता येऊ शकतो.
रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यामध्ये अनेक स्थानिक महिला पावसाच्या मोसमामध्ये जंगलामध्ये जाऊन अळंबी शोधून विकण्यासाठी आणतात. दिवसाला पाहायला गेले तर, साधारण दोन हजारापर्यंत उत्पन्न त्यांना मिळते, अर्थात त्यामध्ये मेहनतही तेवढीच असते. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक पावसाळ्यामध्ये अनेक रानभाज्या, अळंबी यांची विक्री करून उत्पन्न या ग्रामीण भागातील महिला घेतात.
अळंबीला महाराष्ट्र, गोव्यासह अनेक राज्यांसह, परदेशामध्ये मागणी जास्त असल्याने अनेक तरुण तरुणी अळंबीचे उत्पादन घेण्यास उद्युक्त झाले आहेत, हॉटेल व्यावसायिक सुद्धा मोठ्या प्रमाणावर मागणी करत असल्याने अळंबी उत्पादन घेणे फायद्याचे ठरते.