रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यांची डागडुजी आणि जिल्ह्याला जोडणाऱ्या महामार्गांची कामे सुरु आहेत. त्यामुळे वाहन चालकांना विनाकारण शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. मुख्य रस्त्यांचे काम सुरु असेल तर मग पर्यायी मार्ग म्हणून इतर रस्त्यांकडे वाहतूक वळवली जाते. अनेक वेळा अपघातांचे प्रकार सुद्धा घडतात.
काल मुंबईच्या दिशेने व गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. राजापुरातील ब्रिटिशकालीन पुलावर झालेल्या अपघातामुळे दोन्ही दिशेने जाणारी वाहने महामार्गावरच अडकून पडली. राजापुरात रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर हा अपघात घडला.
या अपघातात कोणी जखमी झाले नसले तरी महामार्गावरील वाहतूक तीन तासांपेक्षा अधिक काळ ठप्प होऊन दुतर्फा वाहनांच्या दोन कि.मी. रांगा लागल्या होत्या. ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक पर्यटक विविध शहरांतून, राज्यातून कोकणात दाखल होत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हायवेवर गर्दी झालेली पाहायला मिळत आहे.
अशा प्रकारे नेमका अरुंद असलेल्या पुलावर हा अपघात घडल्याने रस्त्याच्या दुतर्फा दोन किलो मिटर पर्यंत लांबच्या लांब रांगा लागलेल्या दिसून येत होत्या. ना धड कोणत्याच बाजूच्या वाहनांना मागे पुढे जायला जागाच शिल्लक नसल्याने वाहतुकीचा पूर्ण खोळंबा झाला. राजापूर एसटी आगार ते कुंभारवाडी पर्यंत रांगा वाढतच चालल्या होत्या. पोलीस यंत्रणा देखील उपमुख्यमंत्र्यांच्या बंदोबस्तात असल्याने, त्या अपघातस्थळी केवळ २ पोलीस हजर होतेत.
या दोन्ही ट्रकची धडक एवढी जबरदस्त होती कि जरी जीवित हानी झाली नसली तरी, हि अपघातग्रस्त वाहने त्या स्थळावरून हलवण्यासाठी क्रेनची मदत घ्यावी लागणार होती आणि ती क्रेन येईपर्यंत साधारण २ ते अडीच तासाचा अवधी लागला.