राजापूर येथील संभाव्य रिफायनरी प्रकल्पाबद्दल बारसू सोलगाव पंचक्रोशीचा कडाडून विरोध असल्याचे ग्रामस्थांततर्फे जाहीर करण्यात आले आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विलास चाळके यांना बारसू सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेच्यावतीने या संदर्भातील निवेदन देण्यात आले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याचप्रमाणे नाम. उदय सामंत आणि शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रिफायनरी प्रकल्प राजापुरात होणार नाही असे स्पष्टपणे जाहीर केले आहे. त्याचप्रमाणे राजापूर तालुक्यातील अन्य ग्रामपंचायतींचा देखील काहीही संबंध नसताना मासिक सभेमध्ये प्रकल्प समर्थनाचे ठराव मंजूर करून घेऊन, अनेक जुन्या आणि सेनेच्या प्रामाणिक शिवसैनिकांमध्ये फूट पाडण्यात आली आहे. रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करणारे कोविड महामारीच्या कालावधीमध्ये मोर्चा आणि सभांना बंदी असल्याचा फायदा घेऊन सेनेमध्ये असंतोष निर्माण करत आहेत.
राजापूर पंचक्रोशीतील अनेक ग्रामपंचायतींवर राजकीय दबाव असून सुद्धा त्याने प्रकल्पाविरोधात ठराव केले आहेत. गावातील मुंबईस्थित जे ग्रामस्थ आहे त्यानी देखील प्रकल्पाला विरोध दर्शवला असून, त्याचप्रमाणे मुंबईतील रिफायनरी विरोधी संघटना देखील स्थापन करण्यात आली आहे. त्या संघटनेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष, सदस्यांनी मिळून गावकऱ्यांना आवाहन केले आहे की ज्या प्रकल्पामुळे गावचे नुकसान होणार असेल, असा प्रकल्प आपल्या गावात होता कामा नये. काही लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, विविध कंपनीचे अधिकारी, बाहेरच्या राज्यातील व्यापारी हा प्रकल्प इथेच व्हावा यासाठी सरपंचांवर दबाव टाकण्याचे काम करत आहे, त्याचप्रमाणे अनेक खोट्या गोष्टींची आमिषे देखिल दाखवण्यात येत आहेत. तरीसुद्धा बाजू सोनगाव पंचक्रोशी तर्फे रिफायनरी प्रकल्पाला विरोध दर्शनात आला आहे.