राज्यसभा निवडणूक निकालाचा सस्पेन्स अखेर संपला आहे. मतदानानंतर तब्बल नऊ तासांनी निकाल हाती लागला. त्यात या निवडणुकीत शिवसेनेचा एक, भाजपचे तीन, तर राष्ट्रवादीचा एक तर काँग्रेसचा एक उमेदवार विजयी झाला आहे. त्यात संजय राऊत, पियुष गोयल, अनिल बोंडे, इम्रान प्रतापगढी, प्रफुल पटेल विजयी ठरले आहेत.
राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यामुळे यंदाच्या राज्यसभा निवडणुकीत अधिक चुरस पाहायला मिळाली. त्यातच शुक्रवारी मतदान पार पडलं. मात्र, संध्याकाळी ५ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार होती. मात्र महाविकास आघाडी आणि भाजपकडून एकमेकांच्या काही आमदारांच्या मतावर आक्षेप घेण्यात आल्यामुळे निकालाला मध्यरात्री उजाडली. मात्र, महत्वाची बाब म्हणजे भाजपनं घेतलेल्या आक्षेपानंतर शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचं मत बाद करण्यात आलं. तर उर्वरित २८४ मतं वैध ठरवण्यात आली.
राज्यसभा निवडणुकांचा निकाल अखेरीस लागला आहे. शिवसेनेचे संजय राऊत यांना ४१ मते मिळाली आहेत. राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल यांना पहिल्या पसंतीची ४३ मते मिळाली आहेत. काँग्रेसच्या इम्रान प्रतापगढी यांना पहिल्या पसंतीची ४४ मते मिळाली आहेत. भाजपाच्या पियुष गोयल यांना ४८ तर अनिल बोंडे यांना ४८ मते मिळाली आहेत. भाजपचे दोन तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी उमेदवार विजयी होणार यात कुठलीही शंका नव्हती. मात्र, भाजप आणि शिवसेनेकडून सहाव्या जागेसाठी देण्यात आलेल्या उमेदवारापैकी कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं.
या निवडणुकीत भाजपकडून पियुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं होतं. तर शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवार यांना, काँग्रेसकडून इम्रान प्रतापगढी, राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी देण्यात आली होती. सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. महाविकास आघाडीला आणि पर्यायानं शिवसेनेला मोठा धक्का बसलाय.