26.2 C
Ratnagiri
Thursday, February 12, 2026

रत्नागिरीतील नाट्यगृह नाकापेक्षा मोती जड

रत्नागिरी पालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक आणि चिंताजनक...

ग्रामीण कृषी सहकार साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे मालगुंडमध्ये दिमाखात अनावरण

“ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची सुख-दु:खे, संघर्षाची गाथा आणि...
HomeMaharashtraराज्यसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरु, मुख्यमंत्र्यांचा इतर लहान पक्षांना सूचक इशारा

राज्यसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरु, मुख्यमंत्र्यांचा इतर लहान पक्षांना सूचक इशारा

या निवडणुकीत महाविकास आघाडीकडे आमदारांची संख्या जास्त असल्याचं दिसत असलं तरी तितकं प्रकरण सोपं नाही.

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण प्रचंड तापलं आहे. येत्या १० जूनला राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान होणार आहे. सहा जागांसाठीच्या या निवडणुकीत सहा  उमेदवार असल्याने चुरस वाढली आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडी सरकारला समाजवादी पक्षाचा पाठींबा दर्शविला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीकडे आमदारांची संख्या जास्त असल्याचं दिसत असलं तरी तितकं प्रकरण सोपं नाही.

विशेष म्हणजे शेवटच्या उमेदवारासाठी महाविकास आघाडीला बहुमताच्या आकडा गाठण्यासाठी अवघे सात ते आठ उमेदवारांची गरज भासणार आहे. त्यासाठी बहुजन विकास आघाडी, समाजवादी पक्ष आणि अपक्ष आमदारांचे मते महत्त्वाची आहेत. पण राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सपा नेते अबू आझमी हे महाविकास आघाडी विरोधात टीका करताना दिसत आहेत. या शिवाय बहुजन विकास आघाडीकडूनही महाविकास आघाडीला पाठींबा देण्याबाबतची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही.

त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांना मोठा इशारा दिला आहे. “अपक्ष आणि इतर लहान पक्षांची नाराजी आपण दूर करतोय. पण जे फुटण्याची भाषा करत आहेत त्यांनीही हे लक्षात ठेवावं. पुढील अडीच वर्ष आपलंच सरकार असणार आहे. त्यामुळे त्यांच्या मतदारसंघातील कामं करण्यासाठी त्यांना आपल्याकडेच यायचं आहे”, असं सूचक विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं. मुंबईच्या ट्रायडेंट हॉटेलच्या सभागृहात ते बोलत होते. ट्रायडेंट हॉटेलमध्ये महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उद्धव ठाकरे यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे दिग्गज नेते मल्लिकार्जुन खर्गे प्रत्यक्ष उपस्थित होते.

राज्यसभा निवडणुकीनंतर लगेच दहा दिवसांनी विधान परिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यामुळे राज्यसभेची निवडणूक ही महाविकास आघाडी आणि भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे. या निवडणुकीत शिवसेनेचे दोन,  काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी एक उमेदवार निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत. या निवडणुकीत एकाही उमेदवाराचा जरी पराभव झाला तरी तो मोठा फटका असणार आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे.

RELATED ARTICLES

Most Popular