रत्नागिरीमध्ये काल पुन्हा सुरु झालेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेचा अनेक कार्यकर्त्यांना आर्थिक फटका बसला आहे. काल सकाळी केंद्रीय मंत्री नारायण राणे जन आशीर्वाद यात्रेच्या निमिताने हेलिकॉप्टरने रत्नागिरीमध्ये दाखल झाले. रत्नागिरी विमानतळावर उतरल्यावर ते मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर पुष्पवृष्टी करून, त्यांना वंदन करून आपल्या यात्रेला पुन्हा सुरुवात होणार होते.
एकतर केंद्रीय मंत्री झाल्यापासून, नारायण राणे पहिल्यांदीच रत्नागिरीमध्ये येणार होते, पण नंतर झालेल्या वादग्रस्त परिस्थितीमुळे काल पासून पुन्हा जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात करण्यात आली. कार्यकर्त्यामध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला होता. ना. राणे यांच्या जंगी स्वागताची तयारी करण्यासाठी मारुती मंदिर येथे मोठ्या संखेने भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र आले होते. आणि या गर्दीचा फायदा चोरट्यांनी उठवला. एवढी मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने चोरांनी तब्बल २ लाख ४१ हजार ८०० रुपयांच्या सोन्याच्या ऐवजावर आणि पाकिटांवर डल्ला मारला आहे.
मोठ्या उत्साहात बीजेपी पदाधिकारी आणि कार्यकर्ते ना. राणेंच्या स्वागताला जमले होते. थेट प्रक्षेपण करणारे कॅमेरे, उत्तम दर्जाची सिक्युरिटी आणि पोलिसांचा गराडा असूनही चोरट्यांनी तब्बल अडीच लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे. याच गर्दीत नगरसेवक मुन्ना चवंडे, सुरेंद्र भाटकर, विष्णू पवार, रामदास शेलटकर हे देखील होते. गर्दीचा फायदा घेत चोरट्याने मुन्ना चवंडे यांच्या गळ्यातील ९० हजाराची सोन्याची चेन, सुरेंद्र भटकर यांच्या गळ्यातील ८० हजाराची चेन, विष्णू पवार यांच्या गळ्यातील ४६,८०० रु. किमतीची चेन व ६८०० रोख रक्कम, रामदास शेलटकर यांच्या गळ्यातील २५००० रु. किमतीची चेन चोरट्याने लांबवली.
परंतु, एवढा पोलीस फौजफाटा तैनात असून आणि अनेक ठिकाणी थेट प्रक्षेपण करणारे कॅमेरे असून देखील चोरट्यांनी अनेकांच्या गळ्यातील सोन्याच्या चेन व खिशातील पाकिटांवर डल्ला मारल्याने आश्चर्य व्यक्त केल जात आहे.