रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने त्याला वेळीच रोखण्यासाठी सर्व सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे, ज्या ज्या ठिकाणी गर्दी होऊ शकते अशा ठिकाणांवर कडक निर्बंध किंवा बंदीच घालण्यात आली आहे. ओमिक्रॉनमुळे अधिक धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने, शासनाने आदेशामध्ये थोडे बदल करून सुधारित निर्बंध लावण्यात आले आहेत.
मागील दोन आठवड्यापासून वेगाने वाढणारी कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या लक्षात घेता, जिल्हा प्रशासन आधीच अलर्ट झाले आहे. राज्याप्रमाणे जिल्ह्यात दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी सारखे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे लसीकरण मोहीम राबविण्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात भार दिला जात आहे.
कोरोनाचा वाढता प्रदूर्भाव लक्षात रत्नागिरी जिल्ह्यात भरवण्यात येणारे सर्व आठवडा बाजार बंद पुढील आदेशापर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत रत्नागिरीचे जिल्हाधिकारी बी एन पाटील यांनी तसे आदेश काढले आहेत. आठवडा बाजारासाठी मोठय़ा प्रमाणावरून बाहेरच्या जिल्ह्यांतून व्यापारी विक्रीसाठी रत्नागिरी जिल्ह्यात येत असतात, तसेच खरेदीसाठी देखील येथे मोठी गर्दी होत असते त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
शहरी भागात याची अंमलबजावणी मुख्याधिकारी यांच्या मार्फत करण्यात येणार आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी कोणतीही पूर्वपरवानगी न घेता आठवडा बाजार सुरू केल्याची गंभीर बाब जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे. या निरीक्षणानंतर जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, साथरोग अधिनियम १८९७ आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये हे आदेश लागू करण्यात आले आहे.