रत्नागिरी तालुक्यातील वाटद- सुतारवाडी येथील नदीत पोहायला उतरलेले ३ कामगार बुडाले. वाटद खंडाळा येथील या दुर्घटनेत एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे तर एका तरूणाला वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले आहे. अजूनही कोल्हापूर येथील एक तरुण बेपत्ता असून त्याचा शोध घेण्याचे काम बुधवारी सायंकाळी उशीरापर्यंत सुरू होते. मात्र त्यामध्ये यश आले नव्हते. बुधवारी दुपारी २.३० वा.च्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. याविषयी स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांकडून / पत्रकारांना देण्यात आलेल्या अधिक माहितीनुसार रत्नागिरी तालुक्यातील वाटद येथील गाव नदीमध्ये पोहायला अनेकजण येत असतात. बुधवारी लावगण येथील ३ कामगार पोहण्यासाठी वाटद-खंडाळा येथे गेले होते.
मागील ३ दिवसांपासून तालुक्यात प्रचंड पाऊस सुरू आहे. नद्या, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. अशात वर्षा पर्यटनाला जाताना सावधगिरी बाळगा, असे आवाहन केले असताना देखील अनेकजण बेफिकिरी दाखवत स्वत:चा जीव धोक्यात घालत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. ३ कामगार पोहायला आले. अशीच घटना तालुक्यातील वाटद येथे बुधवारी दुपारी घडली. जयगडम धील कंपनीतील एका पोट ठेकेदाराकडे कामाला असलेले विक्रम नरेशचंद्र सिंग (वय-३४- मूळ रा. उत्तरप्रदेश), ओमकार सुभाष जाधव (वय २२, रा. कोल्हापूर) व विनिश गोपाळ नायर (वय-३५, रा. गोवा) हे तिघेही दुपारच्या सुमारास नदीत पोहण्यासाठी उतरले होते.
दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक पाण्याचा प्रवाह वाढत गेला.मात्र याची जराही कल्पना त्यांना आली नाही. पाण्याचा प्रवाह वाढत असतानाच पोहायला नदीत उतरलेले तिघेजण अचानक गटांगळ्या खाऊ लागले. बघता बघता पाण्याच्या लोंढा आला आणि तिघेही वाहून जाऊ लागले. हा प्रकार ग्रामस्थांनी पाहिल्यानंतर काहीनी पाण्यात उड्या घेतल्या. तिघांपैकी एकाला वाचवण्यात यश आले तर एकाचा मृतदेह हाती लागला आहे. उर्वरित एकाचा शोध सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होता.
एकाला वाचवले – पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार या घटनेत विक्रम नरेशचंद्र हा मृतावस्थेत ग्रामस्थांच्या हाती लागला. तर कोल्हापूर येथील ओमकार जाधव हा तरुण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला असून त्याचा शोध सुरू आहे. वाटद येथील ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करून गोपाळ नायर या तरुणाला वाचविले. विनिश गोपाळ नायर हा पाण्यात बुडू लागला. त्याने आरडाओरड केल्याने अन्य दोघांनी त्याला वाचवण्यासाठी धाव घेतली. खोल पाण्यात सापडल्याने तिघेही जण बुडू लागले. यातील एकाने स्वतःचा जीव वाचवला. तर अन्य दोघे खोल पाण्यात बुडाले. ग्रामस्थांना या घटनेची खबर लागताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाण्यात बुडालेल्या दोघांची शोध मोहीम हाती घेण्यात आली. यावेळी बुडालेल्या विक्रम नरेशचंद्र सिंग यांचा मृतदेह सापडला असून पाण्यात वाहून गेलेल्या ओमकार सुभाष जाधव याचा शोध बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होता.