शहरांमधील जमीन खरेदी-विक्री व्यवहारात होणारी फसवणूक टाळण्यासाठी प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय भूमी अभिलेखने घेतला आहे. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील आठ मुख्य शहरांमधील मिळून सुमारे १ हजार ८८३ सातबारांपैकी १ हजार ७८० सातबारा उतारे रद्दबातल करण्यात आले आहेत.
राज्यात ज्या शहरांमध्ये सिटी सर्व्हेचे काम पूर्ण झाले आहे, तेथील मिळकतींचे सातबारा उतारा आणि प्रॉपर्टी कार्ड अशी दोन्ही सुरू ठेवण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यातही ही प्रक्रिया जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाकडून हाती घेण्यात आलेली आहे. भूमी अभिलेखने नगर पालिका व नगर परिषद हद्दीत सर्व मिळकतीचे प्रॉपर्टी कार्ड तयार केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शहर हद्दीतील सर्व सातबारा रद्द करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
भूमी अभिलेखकडे शहरी विभागात १ हजार ८८३ एकूण सातबारा नोंद आहेत. त्यापैकी ३१ जानेवारी २०२२ पर्यंत तहसीलदार विभाग स्तरावर १ हजार ७८० सातबारा उतारे रद्द केले गेले आहेत. अद्यापही ९५ उतारे रद्द करणे बाकी आहेत. त्यात रत्नागिरी शहरातील ४८, चिपळूण शहरातील ४४ तर गुहागर शहरातील ३, खेडमधील १ इतक्या उताऱ्यांचा समावेश असल्याचे भूमी अभिलेख कार्यालयाकडून सांगण्यात आले. लांजा, राजापूर, संगमेश्वर, खेड व दापोली ही शहरे सातबारा मुक्त बनली आहेत.
शहरांमधील जमीन खरेदी-विक्री व्यवहारात होणाऱ्या फसवणूकीमुळे भूमी अभिलेख विभागाने सिटी सर्व्हे झालेल्या भागातील सातबारा उतारे बंद करण्याचा निर्णय घेऊन प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जानेवारी २०२२ अखेर रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण १ हजार ७८० सातबारा उतारे रद्द करण्यात आले आहेत.