जिल्ह्यात यंदाच्या मासेमारीच्या हंगामात समुद्रात वादळसदृश परिस्थिती निर्माण होत असल्याने, मच्छीमारी व्यवसाय अडचणीत आला आहे. मागील आठवड्यात देखील खोल समुद्रात वादळसदृश्य परिस्थिती होती. ते सरल्यानंतर आता गडगडाटासह परतीच्या पावसाला सुरूवात झाली असून, किनारपट्टी भागात देखील वारे वाहू लागले आहेत. पाण्याला चांगलाच जोर असून गिलनेटने मासेमारी करणाऱ्यांना त्याचा फटका बसलेला आहे.
सध्या बदलत्या प्रवाहांमुळे मासळी समुद्राकडून किनाऱ्याकडे येऊ लागली आहे. परिणामी गेले दोन आठवडे सर्वच मच्छीमाऱ्याना चांगलीच विविध प्रकारची मच्छी मिळत आहे. बदलत्या प्रवाहांमुळे विविध प्रकारची मासळी एकाच ठिकाणी सापडत असल्याचे मच्छीमारांची देखील लगबग सुरु झालेली दिसून येत आहे. नवरात्रीच्या कालावधीत प्रवाहांची दिशा ठरलेली असल्याने या कालावधीत नऊ प्रकारचे मासे मच्छीमारांच्या जाळ्यात सापडतात. याचा फायदा ट्रॉलस्, पर्ससिननेटने मासेमारी करणाऱ्यांना होत आहे. ५० ते १०० टब मासळी मिळत आहेत. त्यात फिशमिलला तेल काढण्यासाठी दिला जाणारा उष्टी बांगडी मोठ्या प्रमाणात आहे. त्याचा दर १६ ते १८ रुपये किलो इतकाच आहे. जास्तीचा दर मिळत नसल्याने सध्या आहे त्या दरावरच मच्छीमारांना समाधान मानावे लागत आहे.
परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. बदलत्या वातावरणामुळे खोल समुद्रातील मासे किनारपट्टीकडे येऊ लागले आहेत. हा मासा पकडण्यासाठी मच्छीमार उडया घेत आहेत. काळबादेवी, भाट्ये, गणपतीपुळे, जयगड, नाटे परिसरात मोठ्या प्रमाणात नौका दिसू लागल्या आहेत. या कालावधीत नऊ प्रकारचे मासे सापडत असले तरीही अपेक्षित दर मात्र अद्यापही मच्छीमारांना मिळालेला नाही.
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात खोल समुद्रात ट्रॉलर्स आणि पर्ससिननेटच्या जाळ्यामध्ये काही प्रमाणात म्हाकुळ मिळत होता. पण समुद्रात उठलेल्या वादळामुळे म्हाकुळ आणखीन खोल समुद्राकडे गेला. म्हाकुळला दर चांगला मिळत असल्याने गिलनेट मच्छीमार या माशाची वाट बघत आहेत.

