रत्नागिरी जिल्ह्यात आत्ता मंदिरांसोबतच घरांमध्ये देखील चोरीचे प्रमाण हळूहळू वाढत आहे. शहरी भागामध्ये देखील अनेक जण गणपतीच्या सणासाठी गावाला गेली असल्याचे निमित्त साधून चोरट्यांनी डल्ला मारला आहे.
रत्नागिरीतील मारुती मंदिर परिसरातील आनंद नगर येथे राहणारे डॉ. मिलिंद कुळकर्णी यांच्या बंद बंगल्यामध्ये हा चोरीचा प्रकार घडला आहे. शनिवारी सायंकाळी गणेशोत्सवासाठी ते धामणसे येथे कुटुंबीयांसह गेले होते. सोमवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास डॉ. कुळकर्णी कुटुंबीयांसमवेत रत्नागिरीत घरी परत आले. घराचा मुख्य दरवाजा उघडून आत प्रवेश केला, त्यावेळी किचन जवळचा लोखंडी दरवाजा त्यांना उघडा दिसला. आणि काहीतरी गडबड आहे असे लक्षात आल्यानंतर त्यांच्या पत्नीने वरच्या मजल्यावर जाऊन पहिले असता सर्व प्रकार उघडकीस आला.
गणेशोत्सवासाठी गावी गेलेल्या खासगी डॉक्टरचा बंगला फोडून चोरट्यांनी ३७ हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीला गेलेल्या साहित्यात पाव किलो वजनाचा चांदीचा तांब्या, सोन्याची अंगठी, कानातला जोड या दागिन्यांसह २७ हजार रुपयांची रोकड होती. घरातील देव्हाराही चोरट्यांनी शोधला परंतु, त्यातील सोन्या-चांदीच्या मूर्ती चोरुन नेल्या नाहीत. बंगल्याच्या मागील भागाला असलेल्या लोखंडी दरवाज्याचे कुलूप फोडून चोरटे पसार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
कपाटातील सगळ्या वस्तू अस्ताव्यस्त खोलीभर टाकून ठेवलेल्या होत्या. श्वानपथकाला घटनास्थळी बोलावून घेण्यात आले होते. डॉ. कुळकर्णी यांच्या तक्रारीवरुन चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनी चोरीची खबर मिळताच घटनास्थळी धाव घेतली. चोरट्यांचा माग काढण्यासाठी पथक रवाना झाली आहेत. संशयित वस्तूंचा वास देऊन श्वान चोरट्यांचा माग काढत विश्वनगरपर्यंत गेले आणि त्याच ठिकाणी घुटमळले. घरफोडीनंतर ठसे मिळविण्यासाठी फॉरेन्सिक लॅबची मदत घेण्यात आली आहे. फॉरेन्सिक लॅबचे एक पथक डॉ. कुळकर्णी यांच्या घरी दाखल झाले होते. संपूर्ण बंगल्याची पाहणी करून या पथकाला चोरट्यांचे ठसे मिळविण्यात यश आले आहे.