सध्या सर्वत्र निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून, अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये कॉंग्रेस आणि सेनेला पराभूत करत भाजपाने यश प्राप्त केले आहे. अनेक जिल्ह्यांच्या नगरपालिकेचा कालावधी सुद्धा संपुष्टात आल्याने, लवकरच पालिकांच्या निवडणुकांचे सुद्धा रणशिंग फुंकले जाईल. तर त्याआधी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी प्रभाग रचनेचा आढावा घेतला.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी रत्नागिरी पालिकेची प्रभाग रचना जाहीर केली. एक प्रभाग वाढल्यामुळे १५ ऐवजी १६ प्रभाग झाले आहेत. त्यानुसार ३० ऐवजी ३२ वॉर्ड म्हणजे ३२ सदस्य संख्या झाली आहे.
प्रभाग क्र. ५ मध्ये एकूण लोकसंख्या ४ हजार ३६४ असून यामध्ये क्रांतीनगर, साळवी स्टॉप येथील जलशुद्धीकरण केंद्र झोपडपट्टी, छत्रपती नगर काही भाग, रमेश नगर, पार्से स्क्वेअर, जलतरण तलाव, ट्रक टर्मिनल कलारत्न अपार्टमेंट, गुलमोहर अपार्टमेंट यांचा समावेश आहे तर प्रभाग क्र. ६ची लोकसंख्या ४ हजार ४६६ असून यामध्ये हॉटेल व्यंकटेश, मारूती मंदिर, पार्से स्क्वेअर, छत्रपती शिवाजीनगर काही भाग, नवलाई नगर, आयटीआय अभ्युद्यनगर काही भाग, कर्लेकर कंम्पाउंड, साळगावकर कंपाउंड यांचा समावेश आहे.
प्रभाग पाच आणि सहामधील काही भाग एकत्र करून १६ प्रभाग तयार केला आहे. यासाठी १८ मार्चपर्यंत हरकती मागविण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या प्रभाग रचनेमध्ये प्रत्येक प्रभागात जास्तीत जास्त ५ हजार १३९, तर कमीत कमी ४ हजार ३७४ लोकसंख्या आहे. शहराची एकूण लोकसंख्या ७६ हजार २२९ आहे. त्यानुसार प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे.