आज गौरी गणपतींचे विसर्जन असल्याने, रत्नागिरी शहरातील मांडवी व भाटये समुद्र किनाऱ्यावर अनेक गणपतींचे विसर्जन केले जाते. आणि मोठ्या प्रमाणात गर्दी उसळते. उत्सवाच्या काळामध्ये बाहेरून अनेक चाकरमानी गावाला येत असतात. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी मनाई आदेश जारी केला आहे. १४ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०२१ रोजी गणपती विसर्जनासाठी केवळ मूर्ती घेऊन जाणाऱ्या लोकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. अन्य कोणत्याही कारणासाठी लोकांनी समुद्रकिनारी जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस बंदोबस्त तसेच कोरोना खबरदारीबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी या बंदोबस्ताचा आढावा घेतला. त्यांनी प्रत्यक्ष रत्नागिरी रेल्वे स्थानकावर जाऊन तेथील कामाची पाहणी केली आहे.
उत्सवाच्या निमित्ताने मोठ्या संख्येने चाकरमानी गावाकडे येत आहेत. पण कोरोनाची दुसरी लाट अजून संपुष्टात आलेली नसून, कोरोनाचे संकट अजून डोक्यावर असल्याने केवळ कायदा आणि सुव्यवस्थाच नाही तर कोरोना पासून वाचण्याची सुद्धा खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनबरोबरच आरोग्य विभाग आणि पोलिस विभागही सक्रीय झाला आहे.
पोलिस विभागाकडून महामार्गावर आणि रेल्वे स्थानकावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या बंदोबस्ताची डॉ. गर्ग हे पाहणी करत असतात. पाहणीमध्ये रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही चालू अवस्थेत आहेत का, याची देखील त्यांनी तपासणी केली. कोरोना चाचणी करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांशीही त्यांनी त्यावेळी संवाद साधला असून, त्यांच्या कामकाजाचा देखील आढावा घेतला. तसेच पार्किंग व्यवस्था, एसटी बसेस, येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांच्या मार्गावरही पूर्ण नजर असल्याचे त्यांनी सांगितले.