बंगालच्या उपसागरात नोरू या चक्रीवादळामुळे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून त्यामुळे वातावरणात बदल निर्माण झाला असून, चक्रीवारे वाहन्यास सुरुवात झाली आहे. हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे कोकणामध्येही मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरवात झालेल्या पावसाचा रत्नागिरी शहर परिसरात गुरुवारी दिवसभर जोर होता.
रत्नागिरी, संगमेश्वर, राजापूरसह लांज्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे भात कापण्या लांबणीवर गेल्या असून दोन दिवस पाऊस असाच राहिला तर शेतीचे नुकसान होऊ शकते. सकाळपासून रत्नागिरी परिसरात पावसाला सुरूवात झाली आहे. तसेच हवेत काहीसा गारवा निर्माण झाला आहे.
जिल्ह्यात गुरुवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी ६.८९ मिमी पाऊस झाला. त्यात दापोली ६, खेड १२, चिपळूण ४४ मिमी पाऊस झाला. नोरू चक्रीवादळामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापर्यंत पाऊस राहील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गुरुवारी दिवसभर जोरदार पाऊस सुरू होता. दुपारी काही वेळ फक्त पावसाचा जोर कमी झाला, मात्र पुन्हा वाऱ्यासह पावसाने चांगलाच जोर धरला.
या परतीच्या पावसाचा फटका जिल्ह्यातील भात शेतीला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पहिल्या पावसात भात लावणी केलेली पिके आता कापणीयोग्य झालेली असल्याने, जिल्ह्यात ६८ हजार हेक्टरवर भात लागवड झालेली आहे. दसर्याच्या मुहूर्तावर काहीजण कापणीला सुरूवात करतात; पण दोन दिवस पडत असलेल्या पावसामुळे कापणी थांबवण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. कापणी केलेला भात पावसात भिजले तर ते खराब होण्याच्या भितीने कापणी पुढे ढकलण्यात आली आहे.