जिल्हातील अनेक एटीएम लागोपाठ सुट्ट्या आल्या कि त्यामध्ये कायमच खडखडाट झालेला दिसून येतो. एटीएमच्या वापराचा विचार करायला गेलं तर, एरवी देखील अनेक तांत्रिक अडचणींमुळे ते बंद असते, सिग्नल नसल्याने पैसे निघण्यास अडचणी निर्माण होतात. त्यामुळे अनेक वेळा ग्राहकांना अशा त्रासाला सामोरे जावे लागते. त्याच प्रमाणे लोकांनी सुद्धा एटीएम वापरताना तेथे स्वच्छता राखण्याची जबाबदारी घेणे गरजेचे आहे. जेणेकरून एटीएम स्वच्छ राहतील.
खेडमध्ये काल मंगळवारी सकाळपासून संपूर्ण शहरातील एटीएम मध्ये खडखडाट असल्याचे दिसून आले. त्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. अनेक ग्राहकांना पैशाची तातडीची गरज असताना ते अनेक एटीएम मध्ये धाव घेत होते. मात्र कोणत्याही एटीएम मध्ये पैसे मिळून येत नव्हते. आपल्या खात्यात पैसे असताना आता पैसे कोठून उभे करायचे हा मोठा प्रश्न ग्राहकाच्या समोर उभा राहिला होता.
ग्रामीण भागातून काही रुग्ण आजारी असल्याने डॉक्टरकडे उपचारासाठी येत होते. आपले पैसे एटीएम मधून मिळणाच्या भरवशावर ते आले होते. मात्र एटीएम मध्ये पैसे मिळत नसल्याने रुग्णाला डॉक्टरची व औषधाची रक्कम कशी द्यायची असा यक्ष प्रश्न उभा राहिला होता. आपल्या खात्यात पैसे असूनही वेळेला मिळत नसले तर ते बँकेत कशाला ठेवायचे असा प्रश्न अनेकांना यावेळी पडला होता.
तसेच अनेक एटीएम सेंटरमध्ये दुर्गंधी कचरा पसरला होता. संबंधित व्यवस्थापन या बाबीकडे दुर्लक्ष करत होते. तरी याबाबत संबंधित प्रत्येक बँकाच्या अधिकाऱ्यानी एटीएमकडे दुर्लक्ष न करता होणाऱ्या गैरसोयीकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.