रत्नागिरी शहराजवळील एमआयडीसीमधील अकरा एकर जमिनीवर उभारण्यात येणारे जिल्हा क्रीडा संकुलाचे काम निधी अभावी रखडले होते. मात्र राज्य शासनाने रत्नागिरीसह चार जिल्ह्यांना २३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्यामुळे या कामाला चालना मिळणार आहे. या निधीतून मैदानी खेळासाठी सिंथेटीक ट्रॅक आणि मुलांसाठी वसतिगृह उभारण्यासाठी प्राधान्य मिळण्याची अपेक्षा आहे.
सात वर्षापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते, भूमिपूजन झालेल्या रत्नागिरीतील जिल्हा क्रीडा संकुलाचे काम निधी अभावी रखडले. अकरा एकरच्या जागेमध्ये कार्यालयासाठी इमारती, चारशे मीटरचा मैानी खेळांसाठी सिंथेटीक ट्रॅक, बहुउद्देशीय सभागृह, संरक्षक भिंत उभारण्यात येणार आहे. तसेच खो-खो, कबड्डीसह विविध खेळांची मैदाने आराखड्यासह बनवण्यात येणार आहेत.
त्याचप्रमाणे, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात विविध तालुक्यातील विद्यार्थी खेळासाठी, स्पर्धेसाठी येत असतात. अनेक वेळा राहण्याची काही सोय उपलब्ध नसल्याने एक तर लॉज किंवा हॉटेलमध्ये राहण्याचा आर्थिक भार सोसून स्पर्धेला उपस्थित राहावे लागत असे किंवा मग त्या स्पर्धेला रामराम ठोकावा लागत असे. अशा प्रकारे अनेक खेळाडूंचे नुकसान होत असल्याचे लक्षात घेऊन, स्पर्धांसाठी जिल्ह्यात येणार्या खेळाडूंना राहण्यासाठी ५० मुले, ३० मुली राहतील एवढ्या क्षमतेचे वसतिगृह उभारले जाणार आहे. यासाठी वीस कोटी रुपयांचा प्रस्ताव जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत शासनाकडे पाठवण्यात आला आहे.
सात वर्षांपूर्वी जेंव्हा भूमिपूजन झाले, तेव्हा पाच कोटींचा निधी मिळाला होता. मात्र त्यामधून मैदाने, वसतिगृह बनवण्यापेक्षा कार्यालयीन इमारत, ऑलिंपिकच्या धर्तीवर आकर्षक भिंत उभारण्यावर भर देण्यात आला होता. त्यामुळे मिळालेल्या निधीमध्ये वरील सर्व गोष्टींची पूर्तता करण्यात येणार आहे.