जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणाहून परराज्यातून किंवा परजिल्ह्यातून हंगामी स्थलांतरित असलेल्या कुटुंबातील ६ ते १८ वयोगटातील मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी जिल्ह्यात २० नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत सर्व्हेक्षण केले जाणार आहे. सप्टेंबर ते मे महिन्याच्या कालावधीत बांधकाम, आंबा व्यवसाय, मच्छीमारी व्यवसाय, खाणकाम, रस्ते, कोळसा खाणी, वीटभट्टी, हंगामी कामासाठी कुटुंबाचे स्थलांतर करून रत्नागिरी जिल्ह्यात दाखल होतात.
गेल्या काही वर्षांमध्ये परराज्यातून हंगामी नोकरीसाठी येणारी ही लोकं कुटुंबही बरोबर घेऊन येतात. पालकांसोबत लहान शिकणारी बालकही असतात. सततच्या स्थलांतराने त्या मुलांच्या शिक्षणामध्ये अनेक अडचणी निर्माण होतात. त्या मुलांचे स्थलांतर थांबवणे किंवा स्थलांतरित बालकांना त्याच परिसरात शिक्षणाच्या प्रवाहात कायम ठेवणे या उद्देशाने शिक्षण विभागाकडून पावले उचलण्यात आली आहेत. स्थलांतरित बालकांना शिक्षण हमीकार्ड दिले जाणार आहे. जेणेकरून काम पूर्ण झाल्यानंतर पालकांनी जरी दुसरीकडे स्थलांतर केले तरी तेथील शाळेमध्ये तत्काळ प्रवेश मिळू शकेल.
कामाच्या ठिकाणी सर्वेक्षण करून सर्व मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षकांना सूचना करण्यात आल्या आहेत. हे सर्वेक्षण व्यापक स्तरावर राबवून एकही मूल शाळाबाह्य राहणार नाही, याची काळजी शिक्षण विभागाकडून घेण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली. ६ ते १८ वयोगटातील शाळाबाह्य मुले आढळून आल्यास संबंधित तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकुमार पुजार व शिक्षणाधिकारी वामन जगदाळे यांनी केले आहे.