कोरोना काळामध्ये वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचार्यांची रुग्णांच्या योग्य उपचारासाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देताना तारेवरची कसरत होत होती. काही कर्मचारी आपले काम अगदी प्रामाणिकपणे तर अनेक त्यामध्ये सुद्धा टाळाटाळ करताना दिसत होते. पण कोरोनावर मात करायची तर, सर्वांनी एकजुटीने काम करणे गरजेचे आहे.
रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयाचा कारभार सर्वत्र प्रसिद्ध झाला असताना जिल्हा रूग्णालयातील तत्कालीन निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत शेरखाने यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांच्या मनमानी कामकाजाबाबत राज्याच्या आरोग्य उपसंचालकांकडे तक्रार दाखल केली आहे.
त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून माझे वेतन रोखून ठेवले आहे. याचा माझ्या उदरनिर्वाहावर मोठा विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे डॉ. फुले यांची चौकशी करून त्यांच्या वेतनातून माझ्या भविष्य निधी खात्यावरील बुडलेले व्याज व वैयक्तिक कर्जावरील व्याज वसूल करावे असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.
डॉ. शेरखाने यांनी पत्रकारांना या तक्रारीबाबत माहिती दिली, ते निवासी जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून काम करत होते. मात्र डॉ. संघमित्रा फुले कोणत्या ना कोणत्या कारणावरून त्यांना विनाकारण त्रास देत होत्या. डिसेंबर २०१९ मध्ये मी सेवानिवृत्त झालो असतो, परंतु शासनाने दिलेल्या मुदतवाढीत मी कार्य करत आहे.
मे २०२० मध्ये मानदुखी व पाठदुखीचा त्रास जाणवायला लागलेला. कोविड काळामध्ये सातत्याने कामाचा ताण असल्याने त्यामध्ये अधिकच भर पडली. त्यासाठी वैद्यकीय कारणास्तव रजेची मागणी केली. ती सुद्धा नाकारण्यात आली. कार्यालयात रितसर अर्ज करूनही त्याची दखल घेण्यात आली नाही. हजेरी पटावर अनधिकृत गैरहजर असा शेरा मारून लेखा शाखेत तोंडी सांगून माझे वेतन रोखण्यात आले आणि मला कारणे दाखवा नोटीस देण्यात आल्याचा आरोप डॉ. शेरखाने यांनी केला आहे.