भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंच्या नावाची घोषणा करताच, सर्वांनाच एक प्रकारे आश्चर्याचा धक्का बसला. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय प्रस्तावित होता. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश आज आयोजित करण्यात आलेल्या विशेष बैठकीत उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाला देण्यात आले आहेत. हे महाविद्यालय सुरू करण्याची आग्रही मागणी शिवसेना आमदार उदय सामंत यांनी केली होती.
एकनाथ शिंदेंच्या घेतलेल्या निर्णयासंबंधी त्यांना साथ देणाऱ्या विविध पक्षातील आमदारांना एकनाथ शिंदेंनी त्यांच्या समवेत असलेल्या ५० बंडखोर आमदारांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नसल्याचे म्हटले आहे. तसेच, या आमदारांचे योग्य वेळी अमुल्य साथ दिल्याने आभारही मानले. एकनाथ शिंदे गटात केवळ आमदारच नाही, तर मंत्रीही सहभागी झाले होते. शेवटच्या क्षणाला सिंधुदुर्गाचे पालकमंत्री उदय सामंत यांनी देखील शिंदे गटात सहभागी होत शिवसेनेला मोठा धक्का दिला. आता, मुख्यमंत्री होताच एकनाथ शिंदेंनी उदय सामंतानी केलेल्या मागणीचा तत्काळ विचार करत सामंतांना सुखद धक्का दिला आहे.
पुढील वर्षापासून या नवीन शासकीय महाविद्यालयात प्रवेश घेता येणे शक्य होणार आहेत. विशेष म्हणजे स्वत: एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडिया अकाऊंटवरुन यासंदर्भात माहिती दिली. तर, उदय सामंत यांनीही ट्विटर अकाऊंटवरुन ही माहिती शेअर करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. त्यामुळे उच्च शिक्षणासाठी वेगळ्या शहरामध्ये जावे लागत असल्याने अखेर जन सामान्यांना आणि अभ्यासू विद्यार्थ्यांना आता रत्नागिरीमध्ये उच्च शिक्षण मिळणे सोप्पे जाणार आहे.

