रत्नागिरी आरोग्य विभागातील कर्मचारी कोरोना काळापासून स्वतच्या जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पणे आपले कार्य करत आहेत. सध्या जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव आटोक्यात आला आहे. परंतु, आरोग्य विभागातील अनेक कर्मचाऱ्यांना मागील ५ महिन्यांपासून वेतनच मिळालेले नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवा यासाठी महाराष्ट्र समविचारी सर्वसेवा कामगार संघटनेने संबंधित कार्यालयातच ठाण मांडून बसण्याचा इशारा दिला आहे.
कोरोना काळात काम केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना मागील पाच महिन्याचे वेतन त्वरित अदा करा अन्यथा जिल्हाशल्य चिकित्सकांच्या कार्यालयामध्ये ठाण मांडून बसू असा इशारा महाराष्ट्र समविचारी सर्वसेवा कामगार संघटनेचे अध्यक्ष बाबा ढोल्ये, राज्य सरचिटणीस संजय पुनसकर,मानद सचिव मनोहर गुरव आदिंनी दिला आहे.
या प्रकरणाच्या मिळालेल्या माहितीनुसार, निधी नाही या सबबीखाली कोरोना काळात काम केलेल्या रत्नागिरीतील सर्व सवर्गातील कर्मचाऱ्यांना मागील ०५ महिने वेतन दिले गेले नसल्याने हा कर्मचारी वर्ग आर्थिक दुष्टचक्रात सापडला आहे. आधीच कोरोनामुळे आर्थिक ताण निर्माण झाल्याने आणि त्यामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या अपूरी असताना महिला रुग्णालय सुरु करण्याचा घाट घातला जात आहे.
कोरोना काळात काम केलेल्या कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्याचे मा.सुप्रिम कोर्टाचे आदेश असताना राज्य सरकार अमलात आणत नाही परिणामी गरजेनुसार वापरुन अनेक कर्मचाऱ्यांना तडकाफडकी कमी देखील करण्यात आले आहे. पगार वेळेवर न देता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मनमानी कामे करुन घेतली जात असल्याची माहिती समोर आली आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक पगाराचा विषय काढताच निधी नाही सांगून हात वर करतात. कर्मचार्यांच्या पगारासाठी फक्त पैसे नाहीत मात्र दुसरीकडे लाखोंची खरेदी मोठया प्रमाणात सुरु आहे. हे सारे अन्यायकारक असून वॉर्डबॉय, नर्स, दाई आणि इतर तंत्रज्ञ आणि इतर कर्मचाऱ्यांचे मागील पाच महिन्यांचे थकीत वेतन त्वरित अदा करावे अन्यथा कार्यालयात ठाण मांडून बसण्याचा इशारा शासनमान्य महाराष्ट्र समविचारी सर्वसेवा कामगार संघटनेने दिला आहे.