जेएसडब्ल्यू कंपनीमार्फत दि. ११ जानेवारी ते १७ जानेवारीपर्यंत रस्ता सुरक्षा सप्ताह अभियान साजरा करण्यात येत आहे. या सुरक्षा सप्ताहामध्ये कंपनीतर्फे विविध रस्ता सुरक्षा विषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जेएसडब्ल्यू कंपनीने ३३ व्या रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने शुक्रवार दि. १४ जानेवारी रोजी आयोजित केलेल्या सुरक्षा जागृती अभियानाच्या कार्यक्रमात सासणे बोलत होते. राज्यात आणि देशात रस्ते अपघातात बळी जाणार्यांची संख्या मोठी आहे. ही बाब चिंताजनक असून हे प्रमाण कमी होणे आवश्यक असून प्रत्येकाने सावधनता बाळगली पाहिजे, असे प्रतिपादन रत्नागिरी शहर वाहतूक पोलिस निरीक्षक शिरीष सासणे यांनी केले.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजीव जोशी व त्यांच्या सहकार्यांनी रस्ता सुरक्षाविषयक पथनाट्य सादर केले. त्यानंतर रत्नागिरीचे परिवहन निरीक्षक श्री. काटकर यांनी या सुरक्षेसंदर्भातील नियम, कायदे हे कोणालाही त्रास देण्यासाठी नसून सर्वसमावेशक सोयींसाठी असलेले हे नियम प्रत्येकाने पाळण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. जयगड सागरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक जयदीप कळेकर यांनी निवळी जयगड या रस्त्यादरम्यान अपघात टाळण्यासाठी वाहन चालकांनी कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे हे स्पष्टपणे नमूद केले.
जेएसडब्ल्यू जयगड पोर्टचे हेड करुणकांत दवे यांनी शासनाने आखलेल्या रस्ता सुरक्षाविषयक मार्गदर्शक नियमांचा प्रत्येक वाहन चालकाने वाहन चालवताना वापर करण्याची गरज असल्याचे सांगितले. जेएसडब्ल्यू एनर्जी कंपनीचे व्हाईस प्रेसिडंट पेद्दना रमायनम यांनी रस्ता सुरक्षा विषयक नियमांचे प्रत्येक वाहन चालकाने पालन करून वाहन चालवताना प्रत्येकाने काळजी घेण्याविषयी सांगितले. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर, कंपनीचे अधिकारी वर्ग, सर्व वाहन चालकांनी सुरक्षा विषयक शपथ घेतली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कंपनीचे अधिकारी राजीव जोशी यांनी केले. या रस्ता सुरक्षाविषक जनजागृती कार्यक्रमाला कंपनीचे कर्मचारी, अधिकारी, वाहनचालक उपस्थित होते. कंपनीचे सेक्युरीटी हेड मेजर सुमित खरे यांनी आभार मानले.