राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली आणि राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे व्ही आर जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली लोकअदालत पार पडली.
लोकअदालतचे उद्घाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष व्ही. आर. जोशी यांच्या हस्ते झाले. या वेळी जिल्हा न्यायाधीश -१ एल. डी. बिले, वकील संघाचे सदस्य, वरिष्ठ न्यायाधीश तथा सचिव रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अमित कुलकर्णी व इतर सर्व न्यायिक अधिकारी आणि विधीज्ञ उपस्थित होते. लोकन्यायालयापूर्वी तीन दिवस पूर्वबैठकांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विशेष प्रशिक्षण दिलेल्या कीर विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी यांनी वकील क्षेत्रात पाय ठेवण्याअगोदर लोकांचे वाद समजून घेऊन समुपदेशन उपक्रमात आणि लोकन्यायालयाच्या दिवशी लोकांना सहकार्य करण्यास मोलाचा सहभाग दिला. त्यामुळे सामंजस्याने वाद निवारण मोठया संख्येने करणे शक्य झाले.
लोक न्यायालयामध्ये अशा प्रकारचे निर्णय करताना पक्षकारांना न्यायप्रक्रियेत प्रत्यक्ष सहभाग होता. कोणतेही न्यायालयीन शुल्क द्यावे लागले नाही. वकिल फी, न्यायालयात येण्या-जाण्याचा खर्च, अन्य खर्च आणि वेळेची बचत झाल्याचा आनंद पक्षकारांना चेहऱ्यावर दिसत होता. त्यामुळे अनेक वर्षे रेंगाळलेली न्यायालयीन कामे निकाली लागली आहेत.
राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जिल्ह्यातील २ हजार ८५४ न्यायालयीन प्रलंबित प्रकरणे आणि १२ हजार १६४ वादपूर्व प्रकरणे दाखल करण्यात आली होती. त्यामध्ये ९१४ प्रकरणांमध्ये निवाडा होऊन वाद संपुष्टात आले. ५ कोटी ८६ लाख ७६ हजार ४४६ एवढ्या रक्कमेची वसूली आणि वाद सांमजस्याने मिटविण्यात आले.