कोरोना बाधितांची संख्या कमी होत असल्याने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्व व्यावसायिकांना दुकाने रात्री १० वाजेपर्यंत सुरु करण्याची परवानगी देण्यात आल्याने, पुन्हा एकदा बाजारपेठ गजबजायला सुरुवात झाली आहे. कोरोनाची दुसरी लाट अजून संपुष्टात आलेली नसल्याने, नागरिकांनी आणि व्यापार्यांनी सतर्क आणि योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासन वारंवार करत आहे.
काहीच दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपल्याने, रत्नागिरीतील बऱ्याच दुकानांमधून गणपतीच्या आगमनासाठी लागणारे विविध प्रकारचे साहित्य आणि रोषणाई उपलब्ध होत आहे. अनेक व्यावसायिकांनी अत्यंत कमी किंमतीत आकर्षक अशी सजावट साहित्य, मखर, इलेक्ट्रॉनिक्स, रंगरंगोटी साहित्य उपलब्ध ठेवली आहेत. तर काही ठिकाणी गणेशमुर्तीही विक्रीला उपलब्ध झाल्या असून गणेशभक्तसुद्धा आपल्या पसंतीची मुर्ती आरक्षित करण्यासाठी आत्तापासूनच लगबग करत आहेत. गणपतीच्या आगमनाची व्यापार्यांकडून तयारी फुल्ल झाली आहे.
यंदाच्या वर्षी गणेशोत्सवामध्ये गौरींचे पूर्वा नक्षत्रात आगमन होणार असल्याने, नवीन लग्न झालेल्या सुवासिनींना ओवसा हा पारंपरिक विधी साजरा करता येणार आहे. ओवशासाठी आवश्यक असणार्या लहान मोठ्या आकारातील सुपांच्या खरेदी विक्रीला तालुक्यामध्ये सुरुवात झाली असून, काही ठिकाणी आगाऊ ऑर्डर घेऊन बनवून दिल्या जातात. आठवडा बाजार परिसरामध्ये काही ठिकाणी वेत बांबूवाली लोक विविध प्रकारच्या वस्तू बनवून देत असतात, सणासूदाला अशा वस्तूंना मागणी मोठ्या प्रमाणात असते. एक ओवसा म्हणजेच छोट्या मोठ्या सुपांचा संचांची किंमत साधारण १००० ते १२०० पर्यंत असते.
शहरी भागामध्ये सुद्धा अनेक दुकानांमधून आधुनिक विद्युत रोषणाई, रांगोळ्या, विविध फुलंच्या माळा, तोरणे, इलेक्ट्रॉनिक्स साहित्य, मखर, विविध प्रकारचे कपडे आणि प्रामुख्याने घराच्या रंगरंगोटीसाठी लागणारे रंग, पडदे अशी अनेक प्रकारची दुकाने सज्ज झाली आहेत. तर खाण्यापिण्याची चंगळ असणारी गोड धोड पदार्थांची दुकाने, काही ठिकाणी सुका मेवा तर काही ठिकाणी मिठाईची दुकानेही गणेशोत्सवाची आतुरतेने वाट पहात आहेत. सर्वांकडून विघ्नहर्ता गणपतीकडेएकच मागणे आहे कि, मागील वर्षीचा गणपती कोरोनाच्या सावटाखाली गेला असून, आत्ता मात्र कोरोनाच संकट समूळ नष्ट कर आणि सर्वाना निरोगी आरोग्य लाभूदे.