रत्नागिरी नगर परिषदेचे रत्नागिरी शहर भागामध्ये काही दवाखाने गेली अनेक वर्षे सुरू होते. या सर्व दवाखान्याची दुर्दशा झालेली दिसून येत आहे या दवाखान्यांमध्ये सर्वसामान्य गरीब कुटुंबातील लोकांना, नगरपरिषदेतील चतुर्थश्रेणी, सफाई कामगार कुटुंबांना आरोग्य दृष्टिकोनातून सेवासुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या नगरपरिषदेच्या दवाखान्याची कामगिरी गेली अनेक वर्षे महत्वाची आहे.
रत्नागिरी नगर परिषदेच्या दवाखान्या पैकी अनेक दवाखाने बंद अवस्थेत आहे तर काही दवाखान्यांच्या इमारती या दुरुस्तीला आलेल्या आहेत, तर काही इमारती धोकादायक झालेल्या आहेत, तर अनेक ठिकाणी आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीत डॉक्टर, नर्स यांची देखील कमतरता दिसून येत आहे.
रत्नागिरी शहरातील गाडीतळ येथे रत्नागिरी नगरपरिषदेच्या अधिपत्याखालील आयुर्वेदिक दवाखाना आहे; परिसरातीलच नव्हे तर तालुक्यातील अनेक नजीकच्या गावांमधील लोक उपचारासाठी या दवाखान्यांत कित्येक वर्षापासून येत आहेत. अनेक गरीब, श्रमिक, कष्टकरी याबरोबर असंख्य मध्यमवर्गीय या दवाखान्याचा लाभ घेतात, परंतु आता हा दवाखाना ज्या इमारतीमध्ये सुरु आहे, ती इमारत पूर्णपणे जीर्ण होत आलेली असून या इमारतीचे अनेक अवशेष ढासळत आहेत.
परंतु, मानण्यासारखी एक गोष्ट आहे कि, अनेक गोष्टींचा अभाव असताना देखील हा दवाखाना वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी नेटाने सुरू ठेवला आहे. आजही या दवाखान्यात शेकडो रुग्णांची रांग लागलेली दिसून येते मात्र येथे अनेक सोयीसुविधांचा अभाव आहे. या परिस्थितीत तेथील कर्मचारी काम करत आहेत हे देखील कौतुकास पात्र आहे. अनेकदा मागणी करूनही याकडे गांभीर्याने पाहिल्याचे दिसत नाही.
नगर परिषदेचे हे सर्व दवाखाने सर्व सोयी सुविधांनी सुरू करावेत, जेणेकरून शहरातील मध्यमवर्गीय आणि गोरगरीब जनतेला आरोग्याच्या उत्तम सोयी सुविधा देणे शक्य होइल. अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्याकडे भाजपा शहर चिटणीस निलेश आखाडे यांनी केली आहे.