कोकणवासीयांचा होळी आणि गणेशोत्सव हे जिव्हाळ्याचा उत्सव. या निमित्ताने मुंबई, पुण्यासह विविध ठिकाणाहून अनेक कोकणवासीय मोठ्या संख्येने गावी येतात. कोरोनामुळे घालण्यात आलेल्या विविध निर्बंधामुळे अनेकांना मागच्या वर्षी गावी येता आले नव्हते. मात्र, यावर्षी एक तर कोरोना निर्बंधित लस उपलब्ध झाल्याने आणि खास चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वे आणि एस.टी. महामंडळाने मोठ्या प्रमाणात वाहतूकीची सुव्यवस्था उपलब्ध करून दिल्याने मोठ्या संख्येने चाकरमानी गावी येण्यास तयार झाले आहेत.
सणा उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी उसळत असल्याने कोरोनाचे संक्रमण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पूर्वनियोजन म्हणूनच खबरदारी घेण्यासाठी पोलीस दल सज्ज झाले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहीतकुमार गर्ग यांच्या निर्देशानुसार पोलीस अधिकारी व अंमलदार गावोगावी प्रत्यक्ष फिरून जनजागृतीसाठी बैठका घेत आहेत. गावागावामध्ये जाऊन अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, उपविभागीय पोलीस अधिकारी वाघमारे व वाहतूक पोलीस निरीक्षक शिरीष ससाने व अन्य पोलीस अधिकारी, अंमलदार आणि कर्मचारी जनजागृती करताना दिसत आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पोलीस दलाने गाव दत्तक योजनेचा उपयोग पोलीस दलाला यानिमित्ताने होणार आहे. या व्यवस्थेमुळे लोकांपर्यंत थेट पोहोचून कोरोनाच्या बाबतीत घ्यावयाची खबरदारी तसेच सण, उत्सव शांततेत साजरे करण्याचे आवाहन पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे, तसेच शासनाने या उत्सवासाठी घालून दिलेल्या निर्बंधाची माहिती देखील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचत आहे. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या बैठकांच्या माध्यमातून ग्रामपंचायत स्तरावर ग्रामस्थांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जेणेकरून जिल्ह्यात आटोक्यात येत असलेला कोरोना पुन्हा वाढू नये.