पोलीस हा शब्द जरी ऐकला तरी सर्व सामन्यांचा थरकाप उडतो. कोरोनाच्या या महामारीमध्ये पोलिसांनी निभावलेली भूमिका सर्वांसमोरच आहे. पोलीसांची अनेक रूप आपण पाहतो. त्यांचे देशसेवेचे हे कार्य कायमच अभिमानास्पद आहे. रत्नागिरी पोलिसांची सतर्कता आणि दमदार कामगिरी सर्वज्ञात आहे. पोलिस हे एक पद असले तरी तो सुद्धा एक माणूसच आहे. आणि कोणालाही एखाद्या गोष्टीसाठी प्रोत्साहन मिळाले कि आयुष्यात अनेक सकारात्मक बदल घडून येतात. रत्नागिरी पोलिसांसाठी पण एक आनंदाची गोष्ट घडली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण २१२ पोलीसांना पदोन्नती देण्यात आली आहे. रत्नागिरी पोलीस मुख्यालय मैदानाजवळील पोलीस ठाणे आणि कार्यालयातील २१२ पोलिसांना बढती मिळाली आहे. यामध्ये ३१ पोलीस हवालदार यांना सहा. पोलीस उपनिरीक्षक या पदावर, ७२ पोलीस नाईक यांना पोलीस हवालदार या पदावर आणि १०९ पोलीस शिपाई यांना पोलीस नाईक या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.
याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, एस.एल.पाटील यांच्या हस्ते आणि इतर पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्या उपस्थितीमध्ये पदोन्नती मिळालेल्या पोलिसांना वरिष्ठ पदाचे स्तर आणि फीत लावून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. हे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी १ जुलै रोजी काढले. जिल्ह्यातील अन्य पोलीस ठाण्यांमध्ये कार्यरत असलेल्या आणि पदोन्नती झालेल्या पोलीस अमलदारांना उपविभागीय स्तरावर पदोन्नती बाबत आदेश काढण्यात आल्यानंतर करावयाच्या कारवाईमध्ये पोलीस विभागातील सर्व स्तरातील कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.