29.3 C
Ratnagiri
Sunday, June 1, 2025

गुटखा वाहतूक करणारी गाडी चिपळुणात पकडली

मुंबई - गोवा महामार्गावरील कापसाळ येथे गुरुवारी...
HomeRatnagiriग्राम दत्तक योजनेमधील २८ गावे कोरोनामुक्त

ग्राम दत्तक योजनेमधील २८ गावे कोरोनामुक्त

कोरोना काळामध्ये डॉक्टरांच्या बरोबरीने पोलीस यंत्रणा सुद्धा त्याच हिरीरीने काम करत आहे. रत्नागिरीतील कोरोनाची स्थिती लक्षात घेता, जास्तीत जास्त चाचण्या पार पाडून, लवकरात लवकर कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. ही वाढती संक्रमितांची संख्या रोखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी ग्राम दत्तक योजना राबवण्यास सुरुवात केली.

पोलिसांकडून ग्राम दत्तक योजनेंतर्गत कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांची घरोघरी जाऊन तपासणी केली जात आहे. या योजनेअंतर्गत पोलीस दलाने जिल्ह्यातील ५२ गावे दत्तक घेतली असून, दत्तक घेतलेल्या गावांमधील आत्तापर्यंत ७४ हजार लोकांची तपासणी करण्यात आली आहे. सध्या शहरी भागांपेक्षा ग्रामीण भागामध्ये कोरोना बाधित रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत.

जिल्ह्यातील पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी गावे दत्तक घेऊन त्या गावातील ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करणे, गावामध्ये कोरोना रोखण्यासाठी करावी लागणारी जनजागृती करण्याचे काम करत आहेत. त्यासाठी पोलीस खात्यांने एकूण १८० स्वयंसेवक निवडले असून, त्यांना जिल्हा परिषदेमार्फत कोरोना चाचणी करण्याचे विशेष प्रशिक्षणही देण्यात आले आहे. या प्रशिक्षणपूर्ती नंतर स्वयंसेवकांनी ५५६ लोकांची कोरोना चाचणी केली. यामध्ये आशासेविका, पोलीस,  बीट अंमलदार, ग्रामकृती दल, वाडी कृती दल, स्थानिक ग्रामस्थ यांच्यातर्फे गावागावात जाऊन प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रत्यक्ष जनजागृती करण्यात आली आहे.

कोरोना चाचणी मध्ये गावातील लोकांचे तापमान तपासणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, मास्क वापरणे, तसेच कोरोना चाचण्या वाढवणे तसेच गावातील लोकांचे लसीकरण लवकरात लवकर कसे होईल यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. हा सर्व सर्व्हे करताना जर एखादा पोलीस बाधित झाला तर त्याला त्वरित विलगीकरण कक्ष किंवा पोलिसांसाठी तयार केलेल्या कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात येत आहे. सर्व पोलीस आपली काळजी घेऊनच हे आपल्या कर्तव्यावर जात असून, एकूण २८ गावे कोरोनामुक्त करण्यात पोलीस विभागाला यश मिळाले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular