चिपळूण तिवरे येथील धरण २ जुलै २०१९ रोजी फुटून त्याला आज दोन वर्ष पूर्ण झाली. परंतु ते धरण पुन्हा बांधण्याची कोणतीही चिन्हे अद्याप दिसत नाही आहेत. या दुर्घटनेमध्ये १३ घरे वाहून गेली होतीत, आणि २२ जण मृत्युमुखी पडले होते. आम. शेखर निकम आणि खास. विनायक राऊत यांनी धरणाच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली होती, परंतु, शासनाकडून अजून निधी उपलब्ध झालेला नाही.
तिवरे गाव पुनर्स्थापित करण्यासाठी शासनाकडून अनेक प्रकारचे प्रयत्न सुरु आहेतच. मृतांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारकडून प्रत्येकी २ लाख तर राज्य शासनाकडून ४ लाख रुपये देण्यात आले. तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याचे आश्वासनही देण्यात आले होते. कोरोनाच्या उद्भवलेल्या संकटामुळे मुख्यमंत्री निधीतून अजून साहाय्य मिळालेले नाही. तर बाधित कुटुंबापैकी २४ कुटुंबाना अलोरे येथील कोयना प्रकल्पाच्या जागेमध्ये पर्यायी घरे देण्यात आली आहेत, तर काही कुटुंबीयांनी गावातच पुनर्वसन हवे असल्याची मागणी केली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण दुर्घटनाग्रस्तांसाठी चिपळुण तालुक्यातील अलोरे येथे सिद्धी विनायक न्यासाच्या निधीतून पक्की घरे बांधण्यात आली आहेत त्याचे लोकार्पण आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. तिवरे धरणग्रस्तांसाठी सिद्धीविनायक न्यासाने दिलेल्या ५ कोटी रुपयांच्या निधीतून बांधलेल्या २४ घरांचे आज लोकार्पण करण्यात आले असून, त्यांना हक्काचा निवारा मिळत आहे याचे समाधान असून, यातील उर्वरित धरणग्रस्तांनाही एक वर्षाच्या आत घरे देण्यासाठी लागणाऱ्या ७ कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव व आराखडा तातडीने पाठवावा, हा निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिली आहे.
सदर व्हर्चुअल लोकार्पण कार्यक्रमाला पालकमंत्री ॲङ अनिल परब, नाम. श्री.उदय सामंत, सिद्धीविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष श्री.आदेश बांदेकर, खासदार विनायक राऊत, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, आमदार भास्कर जाधव, शेखर निकम, मुख्य सचिव सीताराम कुंटे, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा इत्यादी मान्यवर उपस्थित होते.