27.3 C
Ratnagiri
Sunday, June 1, 2025

गुटखा वाहतूक करणारी गाडी चिपळुणात पकडली

मुंबई - गोवा महामार्गावरील कापसाळ येथे गुरुवारी...
HomeRatnagiriमध्यरात्री वीजेच्या खेळखंडोब्याने रत्नागिरीकर हैराण

मध्यरात्री वीजेच्या खेळखंडोब्याने रत्नागिरीकर हैराण

१२ वाजल्यानंतर संपूर्ण रत्नागिरी शहरातील वीजपुरवठा ठप्प झाला होता.

महावितरणचा वीजपुरवठा गुरूवारी मध्यरात्री खंडित झाल्याने नागरिकांचे अतोनात हाल झाले. उकाड्याने जनता हवालदिल झाली असताना वीजपुरवठा ठप्प झाल्याने रात्रीच्या झोपेचे तर खोबरे झालेच, पण शुक्रवारी सकाळी अनेक रहिवासी संकुलांमध्ये पाण्याअभावी जनतेला मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. दरम्यान वीजपुरवठा नेमका कशामुळे खंडित झाला आहे आणि तो केव्हा सुरळित होईलं याविषयी संपूर्ण रात्रभर महावितरणचे अधिकारी कोणतेही स्पष्टीकरण देऊ न शकल्याने वाढत्या उष्म्यासोबतच नागरिकांच्या संतापाचा पारा देखील वाढला होता. काही संतप्त नागरिकांनी महावितरण कार्यालयात धडक देऊन त्याचा जाब देखील विचारला. रत्नागिरीसारख्या शहरात अचानक वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर पर्यायी व्यवस्था नसावी याबाबत जनतेने नाराजी व्यक्त केली असून पुढाऱ्यांनी पर्यायी व्यवस्था उभारण्यासाठी आजवर काय केले? असा सवाल विचारला जात आहे.

रत्नागिरी शहरात गुरूवारी रात्री ११.३० वाजल्यापासून वीजेचा खेळखंडोबा सुरू झाला. रत्नागिरी शहरात तर वीज नव्हतीच, त्याच जोडीला आसपासच्या गावांमध्येही काळोखाचे साम्राज्य होते. शहरात रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास बहुतांश भागातील वीजपुरवठा खंडित झाला. काही वेळाने तो सुरू झाला. मात्र अवघ्या ५ – १० मिनीटांमध्ये वीज गायब झाल्याने नागरिकांचे हाल झाले. १२ वाजल्यानंतर जवळपास संपूर्ण रत्नागिरी शहरातील वीजपुरवठा ठप्प झाला होता. त्यानंतर सकाळपर्यंत रत्नागिरी शहर आणि आजूबाजूचा परिसर काळोखात होता.

महावितरणशी संपर्क – वाढत्या उष्म्यामुळे हैराण झालेल्या वीज ग्राहकांनी पुरवठा कधी सुरळीत होईल यासाठी महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा नेहमीप्रमाणे फोन एंगेज असल्याची सूचना मिळत होती, असे संतप्त नागरिकांनी पत्रकारांना सांगितले. ज्यांचा फोन लागला त्यांनाही वीजपुरवठा केव्हा सुरळीत होईल हे समजले नाही. नेमका प्रॉब्लेम कुठे आहे, हेच कळत नव्हते.

वीजेचा खेळखंडोबा – काही संतप्त नागरिकांनी सांगितले की, गुरूवारी रात्री ११.३० वा.च्या सुमारास शहरातील वीजपुरवठा खंडित झाला. साधारणपणे १५ ते २० मिनीटांनी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास तो सुरू झाला. त्यानंतर १२.१५ वा. तो पुन्हा खंडित झाल्याने नागरिक हैराण झाले होते. रात्री १२.१५ वाजल्यापासून ते पहाटे ६ वाजेपर्यंत अनेक भागांत वीज नव्हती. काही भागांत तर सकाळी ९ वाजेपर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता.

झोपेचे खोबरे – ऐन मध्यरात्री बत्ती गुल झाल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले. झोपेचे खोबरे झाले. लहान मुलांना सांभाळताना नाकीनऊ आले. डासांनी अनेकांना फोडून काढले. एका बाजूने डास आणि दुसरीकडे घामाच्या धारा ओघळत असल्याने जनतेला मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. मे महिना सुरू असल्याने घरामध्ये पाहुणे मंडळी आलेली आहेत. अनेकांच्या घरांमध्ये कार्यक्रम होते. त्याचा विचका झाला. अनेकठिकाणी सार्वजनिक सत्यनारायणाची पूजा होती. त्याच्या आनंदावरदेखील विरजण पडले.

सकाळी पाण्याचे हाल – हे झाले रात्रीचे हाल. शुक्रवारी सकाळी अनेक रहिवाशी इमारतींमध्ये पाणी नसल्याने या हालात भर पडली. अनेकांची गैरसोय झाली. सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास वीजपुरवठा सुरळीत होताच अनेकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

पर्यायी व्यवस्थेचे काय? – रत्नागिरीसारख्या मोठ्या आणि विकसित होणाऱ्या शहरासाठी महावितरणचा वीजपुरवठा खंडित झाल्यास पर्यायी व्यवस्था नसावी, याबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. कधीही चौकशी करा, १/१० (वन टेन्थ वीजवाहिनी) ला प्रॉब्लेम आहे, असे सांगितले जाते. नेमका दोष कुठे आहे, हे शोधण्यात बराच वेळ जातो. अशावेळी पर्यायी वाहिनी नाही का? पूर्वी फिनोलेक्सकडून पर्यायी व्यवस्था केली जात होती. मात्र आता महावितरण तशी व्यवस्था का करत नाही? असा सवाल नागरिक करत आहेत. पुढाऱ्यांनी पर्यायी वीजवाहिनीसाठी प्रयत्न करायला हवेत अशी मागणी देखील यानिमित्ताने पुढे आली आहे.

लोकांची धडक – दरम्यान गुरूवारी उत्तररात्रीनंतर काही संतप्त ग्राहकांनी महावितरणच्या झाडगाव आणि रहाटाघर सबस्टेशनवर धडक दिली. वीजपुरवठा कधी सुरळीत होईल असा सवाल अधिकाऱ्यांना विचारला. त्यांना पटेल असे उत्तर मिळत नसल्याने वातावरण तापले होते. सुदैवाने काही घडले नाही. मात्र कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो इतके वातावरण तापले होते. लोकांच्या संयमाचा अंत पाहू नका, असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला. सर्व यंत्रणा कोलमडली आहे का? असो सवाल नागरिक विचारत आहेत.

पावसाळ्यात काय होईल ? – मान्सूनपूर्व कामांची कारणे सांगत में हावितरणकडून दिवसभर वीजपुरवठा बंद करण्यात येतो. तरीही रात्री वीज जाते, त्यामुळे मान्सूनपूर्व काय कामे केली जातात, असा सवाल जनता विचारत आहे. पावसाळ्यापूर्वीच हे हाल, तर मग पावसाळ्यात काय होईल ? असा प्रश्न जनतेला पडला, आहे.

RELATED ARTICLES

Most Popular