जिल्ह्यात सध्या पाउस आणि वाऱ्याचे प्रमाण एवढे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत कि, अनेक वेळा मोठे वृक्ष उन्मळून पडल्याचे चित्र अगदी महामार्गावर देखील दिसून येते. अनेक वर्षे महामार्ग शेजारी वाढलेलं महाकाय वृक्ष अति वेगाच्या पावसापाण्याने उन्मळून कोसळतात. त्या वृक्षांसोबत जवळपासचे विजेचे खांब देखील जुने झालेले असतील तर पुर्ण वाकतात. अशीच एक घटना रत्नागिरी जिल्ह्यात घडली आहे.
सैतवडे गावात महावितरण आणि बीएसएनएलच्या निष्काळजी कारभाराचा फटका ग्रामस्थांना बसत आहे. येथील दर्ग्याजवळील महावितरणचा विद्युत पोल आणि बीएसएनएलचा पोल एकत्र टेकले असून यामुळे शॉट सर्किट होऊन दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत तक्रार करूनही संबंधित अधिकारी लक्ष देत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
सैतवडे गावातील खतीब मोहल्ला येथील शेख मोहम्मद दरवेश दर्गे जवळील विजेच्या खांबावर बीएसएनएलचा पोल अक्षरश: झुकला आहे. दोन पोल एकत्र आल्याने या ठिकाणी दुर्घटना होऊ शकते. याबाबतची माहिती गावातील लोकांनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना देऊन सुद्धा याकडे लक्ष दिले जात नाही. जाणूनबुजून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची खंत ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
ज्यावेळी एखादी दुर्घटना घडेल आणि कोणाचा प्राण त्यात गेल्यावर मगच त्याकडे लक्ष पुरवून कारवाई केली जाईल का? अशी विचारणा जनतेतून होत आहे. पण योग्य वेळी माहिती देऊन सुद्धा या गंभीर विषयाकडे लक्ष न दिले जाणे ही आश्चर्याची गोष्ट आहे. संबंधित अधिकारी एखादी मोठी घटना घडण्याची वाट पाहत आहेत का असे या भागातील लोकांचे म्हणणे आहे.